यवतमाळ नगरपरिषद : मागणी करूनही टॅँकर मिळत नसल्याने काँग्रेसचे नगरसेवक संतप्त लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : येथील नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला मंगळवारी काँग्रेसच्या नगरसेवकांनी कुलूप ठोकले. नगरपरिषद पाणी पुरवठा विभागात एकही जाबाबदार अधिकारी नाही. महिला अभियंत्याची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी कुणीच आले नाही. पर्यवेक्षकही दीर्घ रजेवर आहे. त्यामुळे शहरातील काही भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. यामुळे संतापलेल्या प्रभाग आठमधील काँग्रेस नगरसेवकांनी मंगळवारी दुपारी पाणी पुरवठा विभागाला कुलूप ठोकले. यापूर्वी शिवसेना नगरसेवकाच्या पतीने याच विभागात तोडफोड केली होती. कमी दाब असल्याने आठवले ले-आऊट, उन्नती पार्क, बांगरनगर, शिरभाते ले-आऊट, गिरीनगर, अभिनव कॉलनी, अदर्शनगर, संत मणिरामनगर या प्रभाग आठमधील परिसरात नळाचे पाणी पोहोचत नाही. पाणी पुरवठा विभागाने तातडीने टॅँकर सुरू करावे, असा निर्णय सर्वसाधारण सभेत झाला होता. तरीही कोणतीच कारवाई झाली नाही. ठरावीक नगरसेवकांच्या प्रभागात टॅँकरने पाणी पोहोचविण्यात येते, असा आरोप या नगरसेवकांनी केला. मंगळवारी नगरसेवक विशाल पावडे व वैशाली सवाई यांनी पाणी पुरवठा विभागाला कुलूप ठोकून याचा निषेध व्यक्त केला. जोपर्यंत प्रभागात टॅँकर येणार तोपर्यंत कुलूप उघडू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. यावेळी सीओ ज्ञानेश्वर ढेरे बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते.
पाणीपुरवठा विभागाला ठोकले कुलूप
By admin | Updated: June 14, 2017 00:21 IST