दुष्काळाचा परिणाम : भुईमूग काढणीसाठी राबतात शेकडो हातमहागाव : मराठवाड्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळाने शेकडो मजूर स्थलांतरित होत असून, काही मजुरांनी महागाव तालुक्यात आपला डेरा टाकला आहे. तालुक्यातील भुईमुंग काढणीच्या कामावर मराठवाड्यातील शेकडो मजूर राबताना दिसत आहे. लातूर, हिंगोली या जिल्ह्यातील शेकडो मजूर सध्या महागाव तालुक्याच्या शेत शिवारात राबताना दिसत आहे. मराठवाड्यात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईने मजूर स्थलांतरित होत आहे. काही जण शहराकडे धाव घेत आहेत. तर ज्यांच्याकडे कुशल काम करण्याची क्षमता नाही, असे अकुशल कामगार विदर्भात धाव घेत आहेत. महागाव तालुक्यात शेकडो मजूर आले आहेत. शेत शिवारात आपल्या मुलाबाळांसह ही मंडळी राहात आहेत. किमान दोन हजार मजूर तरी महागाव तालुक्यात गावागावात दिसत आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील मजूर अंबोडा परिसरात दिसत आहेत. त्यांची भेट घेतली असता ते म्हणाले, आमच्या गावात हाताला काम नाही. पोट भरायसाठी आणि सहकुटुंब यासाठी आलो आहोत. आमच्या परिसरात पाण्या अभावी भुईमुंग घेतला जात नाही. परंतु इकडे मोठ्या प्रमाणात भुईमुंग असल्याने हाताला काम मिळत आहे. कोरडवाहू शेती आणि पाणीटंचाईमुळे गाव सोडावे लागल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)मजूर उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासाविदर्भात मजुरांची टंचाई कायम असते. मजूर असले तरी शेतात राबायला तयार नसतात. त्यामुळे मराठवाड्यातून आलेल्या या मजुरांमुळे महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दिवसरात्र मेहनत करून पोटाची खळगी भरण्याची तयारी या मजुरांची असते. महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतीची कामे असली तरी स्थानिक मजूर काम करायला तयार नसतात. आता मराठवाड्यातील मजूर आल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. कामही झटपट होत आहे. स्थलांतरित मजुरांचे हालमहागाव तालुक्यात स्थलांतरित झालेल्या मजुरांचे वादळी पावसाने मोठे हाल होत आहे. रस्त्यावर राहुट्या ठोकून मजूर रहात आहेत. परंतु वादळामुळे त्यांच्या झोपड्या क्षतिग्रस्त झाल्या आहेत. तर काही ठिकाणी झोपड्यात पाणी शिरले आहे. अंबोडा येथे असलेल्या मजुरांना पाच दिवसांपासून पिण्यासाठी पाणी मिळाले नाही. ट्रान्सफार्मर जळाल्याने या मजुरांना पाच दिवसांपासून येथेही पण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
मराठवाड्यातील मजूर महागावात
By admin | Updated: May 13, 2016 02:34 IST