अंजलीला शाबासकीची थाप : कलामांच्या निधनाने खापरी गाव हळहळलेअविनाश साबापुरे यवतमाळमुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टी रुजवून देशाला विकासाची दिशा दाखविणारे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सोमवारी गेले. अख्खा देश हळहळला. खापरीतील (ता. घाटंजी) गोडे कुटुंबीयांमध्ये तर घरातला बुजर्गच गेल्याची दु:खद लहर पसरली.सहा-सात महिन्यांपूर्वीच खापरी गावातल्या एका चिमुकलीने कलामांकडून कौतुकाची थाप मिळविली होती. त्यामुळे कलामांच्या जाण्याने खापरीमध्ये घरातील वडीलधारी व्यक्ती गेल्याचे दु:ख पसरले. गोष्ट याच वर्षाच्या सुरवातीची आहे. ५ जानेवारी रोजी मुंबईत राष्ट्रीय बाल वैज्ञानिक परिषदेचे उद्घाटन होते. देशभरातील प्रज्ञावंत मुले त्यात सहभागी होते. खापरीची अंजली संजय गोडे ही धिटुकलीही आपला प्रयोग घेऊन उपस्थित होती. परिषदेच्या उद्घाटनाला कलाम साहेब आले. उद्घाटनानंतर त्यांनी मुलांच्या प्रयोगाची पाहणी सुरू केली. अंजलीचा प्रयोग त्यांनी व्यक्तिश: न्याहाळला. तिच्याकडून प्रयोगाची माहिती जाणून घेतली. अंजलीची कल्पकता पाहून ‘मिसाईल मॅन’ने तिचा हात हाती घेतला अन् कौतुकाने म्हणाले, ‘‘व्हेरी गुड!’’पुढे जाऊन कृषी क्षेत्रातच संशोधनात्मक काम करण्याचा मानस जेव्हा अंजलीने व्यक्त केला, तेव्हा तर कलामांनी तिला शाबासकीसोबतच भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील अंजलीने शेतकऱ्यांचे श्रम वाचविणारेच यंत्र तयार केले होते. सायकल फवारणी यंत्र. वजनी पंप पाठीवर घेऊन पिकावर फवारणी करणाऱ्या आपल्या वडिलांचे श्रम तिने पाहिले होते. ते पाहूनच तिने हा विज्ञान प्रयोग तयार केला. देशभरातील मुलांच्या गर्दीतही अंजलीच्या प्रयोगाने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे मन खेचून घेतले होते. त्यांची भेट हीच अंजली आणि संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरली. सोमवारी रात्री अचानक कलामांच्या निधनाची वार्ता धडकली अन् अख्खे खापरी गाव हळहळले.
कलाम सर म्हणाले होते, ‘व्हेरी गुड!’
By admin | Updated: July 29, 2015 02:27 IST