विलंब झाल्यास कारवाई : लोकसहभाग घेण्याचे आवाहनयवतमाळ : जलयुक्त शिवारची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न गरजेचे आहे. ही कामे दर्जेदार, कमी पैशात आणि वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. कामांमध्ये विलंब झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात जलयुक्त शिवारच्या या वर्षातील कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुळकर्णी, मुख्य वनसंरक्षक वसंत गुरमे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड, उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, जलयुक्तची कामे १५ जून किंवा पाऊस पडण्याआधी आणि पावसानंतर केवळ वनांमधील कामे करता येतील. त्यामुळे हाती घेतलेली कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. यावर्षी सर्वेक्षण करण्यात आलेल्या कामांपैकी ज्या गावात अद्यापही कामे सुरू झालेली नाही, अशा संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस द्यावी, ही कामे पूर्ण करण्यासाठी गावातील नागरिक आणि ज्यांना या बंधाऱ्याचा फायदा होणार आहे, अशांचे मत परिवर्तन करण्यात यावे, अशा सूचनाही यावेळी दिल्या.नाला खोलीकरण आणि तलावातील गाळ काढण्यासाठी बळीराजा चेतना अभियानातून मदत केली जात आहे. या कामांमध्ये लोकसहभाग अधिक प्रमाणात घ्यावा, असेही यावेळी सुचविले. जलयुक्तची कामे दर्जेदार आणि टिकाऊ होण्यासाठी मशिनचा वापर करावा, कोणत्याही परिस्थितीत जून अखेरपर्यंत ही कामे होण्यासाठी प्रयत्न करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.यावेळी जलयुक्त शिवार अभियानाशी संबंधित विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी अभियानाविषयीची प्रगती यावेळी मांडली. (वार्ताहर)
जलयुक्तच्या कामांना जूनचा अल्टिमेटम
By admin | Updated: May 9, 2016 02:30 IST