रावसाहेब दानवे : भाजपाच्या मेळाव्यात काँग्रेस नेत्यांवर तोंडसुख यवतमाळ : पक्ष चालविताना केवळ गोड बोलून चालत नाही. सत्ता आहे म्हणून चार लोकात तुमचा मान आहे, अन्यथा कुणी विचारत नाही. त्यामुळे हे वैभव टीकवून ठेवा आणि जनतेचा विश्वास संपादन करा, केंद्र व राज्य सरकारकडून अनेक जनहिताच्या योजना राबविल्या जात आहेत, जनहिताचे निर्णय घेण्यात येत आहे, त्याची माहिती गावागावात कार्यकर्त्यांनी पोहचवावी, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात केले. यावेळी त्यांनी काँग्रेस व माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी आपल्या भाषणातून केंद्र सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात भाजपाने प्रथमच विधानसभेच्या पाच जागा जिंकल्या, भविष्यात यामध्ये वाढ झाली पाहिजे, असे अहीर म्हणाले. पक्ष माझ्यासाठी काय करतो, यापेक्षा मी पक्ष्यासाठी काय करतो, हा विचार होणे गरजेचे असल्याचे सांगून आज देशात ११ कोटी व महाराष्ट्रात एक कोटी भाजपा सदस्यांची नोंदणी झाली असून हा आकडा आणखी वाढणार असल्याचे ते म्हणाले. केंद्र शासन सर्वसामान्यांसाठी कधी नव्हे त्या योजना राबवित आहेत. या योजनांची माहिती कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवावी, असे आवाहनही त्यांनी केले. मेळाव्याला जिल्ह्यातील आजी-माजी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर शासकीय विश्रामभवनावर खासदार दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत युती केल्याच्या मुद्यावर विचारले असता ही निवडणूक चिन्हावर होत नाही. त्यामुळे स्थानिक अॅडजेस्टमेंट म्हणून ही युती केली असावी, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, मंत्रीमंडळात समतोल आहे, विस्तारात मात्र यवतमाळ जिल्ह्याचा निश्चित विचार केला जाईल. अमरावती विभागात यवतमाळ जिल्ह्याने सर्वाधिक तीन लाख ७० हजार नव्या सदस्यांची नोंदणी केली आहे. म्हणूनच यवतमाळातून महासंपर्क अभियानाचा प्रारंभ केला आहे. शेतकऱ्यांना माफीचा कोणताही विचार सरकार स्तरावर नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
सत्ता आहे म्हणूनच चार लोकांमध्ये मान
By admin | Updated: July 16, 2015 02:35 IST