उमरखेड (कुपटी) : ग्रामीण तरुणांच्या हाताला काम मिळावे, उद्योग व्यवसाय भरभराटीस यावे यासाठी स्थापन केलेल्या उमरखेड येथील एमआयडीसीत उद्योजकांनी कोट्यवधींची गुंतवणूक केली. मात्र एमआयडीसीतील दुरावस्थेने उद्योगांना गतीच आली नाही. परिणामी बँकांचे व्याज भरुन उद्योगक मात्र त्रस्त होत आहे.उमरखेड शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर एमआयडीसी आहे. औद्योगिक विकास महामंडळाचे एमआयडीसीच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र या ठिकाणी १८ उद्योजकांनी आपले उद्योग सुरू केले. यासाठी राष्ट्रीयकृत बँकांसह खासगी बँकांमधूनही कर्ज घेतले. काजू प्रक्रिया उद्योग, तेल मील, दालमील, बॅटरी निर्मिती, मसाला उद्योग, चहापत्ती, भंगार इन्डस्ट्रीज, टायर रिमोल्डींग, अॅग्रो इन्डस्ट्रीज आदी उद्योग सुरू केले. यासाठी उद्योजकांनी तब्बल ५० कोटींच्यावर गुंतवणूक केली. परंतु आता येथील दुरावस्था पाहता उद्योजक हतबल झाले आहे. एमआयडीसीला २४ तास वीज पुरवठा होणे गरजेचे आहे. परंतु ग्रामीण फिडरवर एमआयडीसी जोडल्याने वीज पुरवठा खंडित असतो. त्याचा मोठा फटका उत्पादनावर होतो. विजेसोबतच पाण्याचीही गंभीर समस्या आहे. ५० लाख लिटर दररोज पाण्याची आवश्यकता असताना ५० हजार लिटर पाणी उपलब्ध होते. यामुळे व्यापारी त्रस्त झाले आहे. यासाठी वारंवार निवेदने दिली. परंतु उपयोग झाला नाही. उत्पादन घटत चालले असून बँकांचे दरमहा व्याज मात्र वाढत आहे. (वार्ताहर)
कोट्यवधींची गुंतवणूक मात्र उद्योगाला गती नाही
By admin | Updated: August 26, 2014 23:44 IST