दोनच आरोपी : जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षायवतमाळ : शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी पुरविण्यात येणारा तांदूळ रिफिलिंग होत असल्याचा प्रकार पोलीस कारवाईतून पुढे आला. त्यानंतर फार मोठी साखळी हाती लागेल अशी शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात मात्र हा अपहार दडपण्याच प्रयत्न यंत्रणेच्यास्तरावरून होत आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्याने पोलिसात तक्रार देऊन गोडाऊन सील करत वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागविले आहे. दोन दिवसात या प्रकरणात कोणतेच धागेदोरे सापडलेले नाही. जिल्ह्यात शालेय पोषण आहराचा तांदुळ पुरवठा करण्याचे कंत्राट जिल्हा मार्केटिंग अधिकारी भगवानदास डगवार यांनी विनोद एन्टरप्रायझेस नागपूर यांना दिले आहे. विनोद एन्टरप्रायझेस कडून जिल्ह्यात आरोपी अर्शद बेग याला जिल्हास्तरावरचे कंत्राट देण्यात आले आहे. मार्केटिंग फेडरेशनकडून फेब्रुवारी अखेरपर्यंत ६५ हजार ६६६ क्विंटल तांदुळाचा पुरवठा झाल्याचे दाखविण्यात आला आहे. शनिवारी दुपारी पोलिसांनी नागपूर बायपासवर तांदुळ घेऊन जात असलेले वाहन ताब्यात घेतले. पोलिसांचा संशय वाढल्याने त्यांनी आणखी चौकशी केली असता शालेय पोषण आहाराच्या तांदुळ रिफिलिंगचा कारखानाच हाती लागला. मार्केटिंग फेडरेशनच्या कंत्राटदाराने स्वत:च्या गोडाऊनमध्येच हा गोरखधंदा सुरू केला होता. याप्रकरणात कंत्राटदार अर्शद बेग इकबाल बेग आणि चालक आशीष सुधाकर ढाले यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या आरोपींकडून कुठलीही अधिक माहिती अद्यापर्यंत हस्तगत केलेली नाही. या दोन्ही आरोपींना न्यायलयीन कोठडी मिळाली आहे. आता तपास पुढे सरकाण्याची आशाच मंदावली आहे. ज्या वाहनातून ४० कट्टे तादुळ जप्त करण्यता आले, तो कुठे नेला जात होता. हे अद्यापही निरूत्तरीतच आहे. शिवाय ९१ कट्टे असलेले गोडाऊनही सील झाले. मात्र या कामात इतर कोणा-कोणाची मदत घेतली जात होती, रिफिलिंगला बाहेरून कोणाचे पाठबळ होते याचा शोध घेणे अद्यापही बाकी आहे. शालेय पोषण आहारावर डल्ला मारने हा नवीन प्रकार नाही मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच घबाड बाहेर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास केल्यास अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातूनही या रिफिलिंगला पाठबळ मिळत होते का याचाही उलट तपास घेणे गरजेचे आहे. पटसंख्या अधिक दाखवून कमी उचल झाली का याचाही तपास घेण्याची गरज आहे. (कार्यालय प्रतिनिधी)पोलीस कारवाईनंतरच तांदुळ रिफिलिंग होत असल्याचा प्रकार माहीत झाला. त्यानंतर रितसर तक्रार दाखल केली आहे. पोषण आहार पुरवठ्याचे कंत्राट मुंबई येथील प्रधान कार्यालयाकडून दिले जाते. कोणती एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. याचीसुद्धा माहिती स्थानिक पातळीवर राहत नाही. वरिष्ठांकडून मिळालेल्या निर्देशाप्रमाणेच काम करण्यात येते. तादुळ कमी अथवा निकृष्ठ पुरवठा होत असल्याची तक्रार आलेली नाही. पुढील कारवाईबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन मागविले आहे. - भगवानदास डगवार, जिल्हा मार्केटिंग अधिकारी
पोषण आहार रिफिलिंगचा तपास गुंडाळला
By admin | Updated: March 24, 2015 01:17 IST