यवतमाळ : सीएमच्या कार्यक्रमातील संभाव्य गोंधळाबाबत स्टेट इंटेलिजन्सने आधीच पोलिसांना अलर्ट केल्याचे सांगितले जात असले तरी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी मात्र इंटेलिजन्सचा असा कोणताही अलर्ट प्राप्त झाला नसल्याचे स्पष्ट केले.अखिलेशकुमार सिंह ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, एसआयडीकडून मला किंवा वरिष्ठांना संभाव्य आंदोलनांबाबत कोणतीही सूचना प्राप्त झाली नव्हती. समन्वय बैठकीच्यावेळीसुद्धा एसआयडीचे अधिकारी उपस्थित नव्हते. आपण स्वत:हून त्यांना मोबाईलवर संपर्क केला असता, ते पुसदला असल्याचे सांगितले गेले. वास्तविक संभाव्य आंदोलनाबाबत आम्हालाच आगाऊ माहिती मिळाली होती. ही आंदोलने रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा धावपळ करत होती. अखेरपर्यंत त्यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र मोठा बंदोबस्त असल्याने कुठेतरी चूक राहून गेली. त्याबाबत समज देऊन संबंधितांना जाब विचारण्यात आला. व्यावसायिक पद्धतीने बंदोबस्ताचे नियोजन करायला हवे होते, ते होऊ शकले नाही. त्यात सुधारणा करण्याच्यादृष्टीने आढावा घेतला गेला. अपर अधीक्षक काल रजेवर असल्याने त्यांनी ‘लोकमत’ला प्रतिक्रिया दिली. मात्र त्यांना इंटेलिजन्सच्या रिपोर्टबाबत काही माहीत नसावे, असेही अखिलेशकुमार सिंह यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
इंटेलिजन्सचा अलर्ट नव्हता - अखिलेशकुमार सिंह
By admin | Updated: June 18, 2016 01:53 IST