कळंब : येथील चक्रवती नदीचे रुंदीकरण व खोलीकरण लोकसहभागातून करण्यात आले. त्यामुळे नदीची पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. या कामामुळे येणाऱ्या काळात शहर व परिसराला संभवणारी पाणीटंचाईची तीव्रता कमी होणार आहे. या कामाची माहिती घेण्यासाठी गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी ‘मिशन चक्रवती’ची गुरुवारी पाहणी केली.काम कधी सुरू झाले, कशा पध्दतीने करण्यात आले, लोकांचा कसा सहभाग मिळाला, लोकांनी स्वयंस्फूर्तीने कसा निधी देऊन सहभाग घेतला याची माहिती ना.पाटील यांना देण्यात आली. नदीपात्रात भूमिगत बंधारा बांधकामाचीही माहिती देण्यात आली. शासनाकडे नदीच्या कामासाठी पाच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शासकीय निधीतून काम केले जाणार आहे. यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती आमदार डॉ.अशोक उईके यांनी गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्याकडे यावेळी करण्यात आली.यावेळी उपविभागीय संदीपकुमार अपार, तहसीलदार संतोष काकडे, नगराध्यक्ष दिगांबर मस्के, उपनगराध्यक्ष मनोज काळे, बांधकाम सभापती आशिष धोबे, भाजपाचे सरचिटणीस अमोल ढोणे, नगरसेवक राजू पड्डा, मारोती दिवे, मारोती वानखडे, वासुदेव दाभेकर, गोपाल केवटे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
‘मिशन चक्रवती’ची मंत्र्यांकडून पाहणी
By admin | Updated: June 18, 2016 01:55 IST