शिंदोला : महाराष्ट्र शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या नावाने ‘स्वच्छतेतून समृध्दी’कडे असा मंत्र देत मोठा गाजावाजा करून ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले़ मात्र आता अभियानाला उतरती कळा लागली असून यापूर्वी हागणदारीमुक्त झालेली गावेही आता पूर्वपदावर परत येत आहे.या स्वच्छता अभियानाच्या प्रारंभीक काळात वणी तालुक्यातील शेवाळा, चारगाव, नायगाव आदी निवडक गावे हागणदरीमुक्त झाली होती. तथापि लोक सहभागाअभावी या योजनेचे ग्रामीण व शहरी भागात आता तिनतेरा वाजले असून बहुतांश हागणदरीमुक्त गावे पूर्ववपदावर आल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागातील अनेक मार्ग विष्ठेने व्यापलेले असतात़ आडमार्ग घाणीने भरलेले असतात़ ठिकठिकाणी उकीरडे साचलेले असतात़ पावसाच्या दिवसात तर संपूर्ण गावे घाणीने वेढलेली असतात़ परिणामी विष्ठेच्या संपर्र्काने किंवा वाहनांची चाके, चपला-जोडे यांच्याद्वारे होणाऱ्या प्रसाराने रोगांचा गावात प्रसार होतो़ यावर मात करण्यासाठी लोकसहभागातून राबविता येणारे स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले होते.हे स्वच्छता अभियान पुढे जाऊन उत्स्फूर्त लोकचळवळीत परावर्तीत होऊन स्वच्छ, सुंदर, निरोगी परिसराची सवय सर्वांना व्हावी, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे़ परंतु आजपर्यंत राबविल्या गेलेल्या अभियानाकडे दृष्टीक्षेप टाकल्यास या उद्देशाचीच नव्हे, तर संपूर्ण ग्रामस्वच्छता अभियानाचीच वाट लागल्याचे विदारक वास्तव अनुभवायला येत आहे़ केवळ जयंती, पुण्यतिथी या कार्यक्रमांपुरते व छायाचित्र घेऊन फुशारकी मारण्यापुरतेच स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे़ आजही अनेक गावातील पोलीस पाटील, सरपंच, सरकारी नोकरदार, लोकप्रतिनिधी उघड्यावर शौचास जाताना दिसून येत आहे़वैयक्तीक स्वच्छतेपासून घर, परिसर आणि संपूर्ण ग्रामस्वच्छतेची संपूर्ण प्रक्रिया केवळ शासकीय खटाटोपाचा एक भाग झाली आहे. शासनाने ठेवलेले बक्षीस पटकावण्याची एक औपचारिक स्पर्धा असल्याचे स्वरूप, या अभियानाला येऊ लागले आहे़ संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांनी जनमानसात रूजलेल्या अंधश्रध्दांचा पगडा दूर सारून स्वत:च्या कृतीतून कर्मयोगाचे बीजारोपण केले़ हातात झाडू घेऊन गल्लीबोळातील रस्ते झाडताना मनामनातील अज्ञान, अंधश्रध्देचे जाळे साफ करण्याचे कार्य त्यांनी केले़ परिसर स्वच्छतेच्या पर्यायाने निरामय जीवनाचा मूलमंत्र त्यांनी कृतीतून रूजविला़ स्वच्छतेअभावी सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असताना ते स्वच्छ करण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची असल्याची वृत्ती आता नागरिकांमध्ये वाढीस लागली अहे. परिणामी स्वच्छतेच्या समस्येने ग्रामीण भागात आता विक्राळ रूप धारण केले आहे़ लोकसहभागाअभावी स्वच्छता अभियानाला उतरती कळा लागली आहे़ त्यामुणे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
ग्रामीण भागात स्वच्छता अभियानाची लागली वाट
By admin | Updated: September 17, 2014 00:03 IST