दररोज धावतात ८० ट्रक : नऊ पोलीस ठाण्यांना ‘खिरापत’ यवतमाळ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरून जनावरांची अमानवीय वाहतूक केली जाते. दरदिवशी ७० ते ८० ट्रकमध्ये शेळ्या व अन्य जनावरे कोंबून हैदराबादच्या मार्केटमध्ये नेली जात असल्याची माहिती उघडकीस आली आहे.शासनाच्या बंदीनंतरही जनावरांची कत्तल व वाहतूक सुरूच आहे. पूर्वी खुलेआम होणारी ही वाहतूक आता चोरट्या मार्गाने होत आहे एवढेच. दोन दिवसांपूर्वी या राष्ट्रीय महामार्गावर हिंगणघाटनजीक एका ट्रकला भीषण अपघात झाला आणि जनावरांची ही अमानवीय वाहतूक पुन्हा एकदा उघड झाली. या अपघातात तीन जण ठार झाले असून ट्रकमध्ये कोंबून भरलेल्या ३०० पेक्षा अधिक शेळ्यांनाही आपला जीव या अपघातात गमवावा लागला. या अपघातानंतर सदर महामार्गावरून चालणाऱ्या जनावरांच्या वाहतुकीचे मोठे रेकॉर्डच पुढे आले. सूत्रानुसार, लगतची राज्ये व नागपूर विभागातील सर्व जनावरे विक्रीसाठी नागपुरात आणली जातात. तेथून एका विशिष्ट रोडलाईन्सच्या सुमारे ७० ते ८० ट्रकमध्ये ही जनावरे भरुन हैदराबादला नेली जातात. त्यात शेळ्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात केला जातो. महामार्गावरून दररोज एवढ्या ट्रकची पासिंग होते. ट्रकमध्ये शेळ्यांना स्वतंत्र ठेवण्यासाठी विशिष्ट कप्पे (कंपार्टमेंट) केलेले राहतात. मात्र यात या शेळ्या अक्षरश: कोंबून भरल्या जातात. एका ट्रकमध्ये शंभर-सव्वाशे शेळ्यांची क्षमता असताना प्रत्यक्षात त्यात अडीचशे ते तीनशे शेळ्या भरल्या जातात. या प्रवासादरम्यान कुठे शेळी मरण पावल्यास लगेच ती ट्रकच्या बाहेर फेकून दिली जाते. हे ट्रक हैदराबादमधील सिकंदराबादनजीकच्या जनावरांच्या बाजारात दररोज पहाटे ४ वाजता दाखल होतात. ५ वाजतापासून हा बाजार सुरू होतो. ७ पर्यंत हा बाजार चालतो. त्यानंतर जनावरे घेऊन आलेल्या ट्रकमधील मालाला खरेदीदार राहत नाही. अशा वेळी त्याला या संपूर्ण जनावरासह मुक्काम ठोकावा लागतो किंवा परत यावे लागते. मुक्काम केल्यास या जनावरांच्या चाऱ्याचा भूर्दंड पडतो. म्हणून ट्रक चालकांना कोणत्याही परिस्थितीत पहाटे ४-५ पूर्वी सिकंदराबादच्या या बाजारात पोहोचायचे असते. म्हणून महामार्गावरून हे ट्रक भरधाव धावतात. वेळेत ट्रक पोहोचविल्यास रोड लाईन्सच्या मालकाकडून त्यांना ५०० ते १००० रुपये बक्षीस म्हणून दिले जातात. या भरधाव वेगामुळे अनेकदा ट्रकला अपघात होतात. परंतु बरेचदा हे अपघात दडपले जातात. त्याचा गाजावाजा फारसा केला जात नाही. नागपूरपासून महाराष्ट्राच्या हद्दीत बुटीबोरी, हिंगणघाट, जाम चौकी, वडनेर, वडकी, करंजी चौकी, पांढरकवडा, पिंपळखुटी चेक पोस्ट, पाटणबोरी एवढे पोलीस ठाणे लागतात. या सर्व ठाण्याची यंत्रणा जनावरांच्या या वाहतुकीबाबत ‘अलर्ट’ असून त्यापोटी त्यांना मोठा ‘लाभ’ही नागपूरच्या रोड लाईन्सकडून नियमित दिला जातो. पोलिसांच्या आशीर्वादानेच ही वाहने तेलंगाणात पास केली जातात. या रोड लाईन्स मालकाकडे १५० ते २०० ट्रक असल्याचे सांगितले जाते. महामार्गावरून दरदिवशी २५ हजार शेळ्या व जनावरांची वाहतूक केली जाते. (जिल्हा प्रतिनिधी) समाजकार्याच्या आडोशाने खंडणी उकळणारी टोळीशासनाने जनावरांच्या कत्तल व अमानवीय वाहतुकीला प्रतिबंध घातल्यापासून या व्यवसायात कारवाईचा आव आणणाऱ्या काही टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. कोणताही अधिकार नसताना केवळ सामाजिक संघटना म्हणून घेणाऱ्या या टोळ्या संशयावरून वाहने थांबविणे, त्याची तपासणी करणे, पायदळ बाजाराकडे जनावरे घेऊन जाणाऱ्यांना अडविणे असे प्रकार करीत आहे. काहींनी तर अशा ट्रकबाबत पोलिसांना माहिती देतो, अशी भीती दाखवून खंडणी उकळण्याचे प्रकारही चालविले आहे. त्यातूनच अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
महामार्गावरून जनावरांची अमानवीय वाहतूक
By admin | Updated: August 5, 2015 00:02 IST