यवतमाळ : यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांना विविध संकटांना तोंड द्यावे लागत आहे. सुरूवातीला पावसाने दडी मारल्याने दुबार व तिबार पेरणी करावी लागली. आता कसे तरी पीक शेतात दिसू लागले असताना सोयाबीनवर चक्रभुंगा व कीडीचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात झाला आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना न केल्यास सोयाबीनच्या उत्पादनात यावर्षी लक्षणीय घट होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. गेल्या दोन वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यातील शेतीची अत्यंत वाईट अवस्था आहे. मागील वर्षी खरीफाच्या हंगामात अतिवृष्टी व नंतर रबीच्या हंगामात झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीही लागले नाही. यासर्व संकटातून सावरत नवीन वर्षाच्या खरीपासाठी शेतकऱ्याने कंबर कसली होती. परंतु पावसाने पावसाळा सुरू होऊनसुद्धा जवळपास दोन ते अडीच महिने दडी मारली. त्यामुळे पेरण्या होऊ शकल्या नाही. ज्या काही थोड्याफार पेरण्या आटोपल्या होत्या त्यांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली. या सर्व परिस्थितीत शेतकरी त्याच्या अंगावर असलेले कर्ज फेडू शकला नाही. त्यामुळे बँकांनी पुन्हा कर्ज देण्यास नकार दिला. शेतकऱ्यांना पुन्हा खासगी सावकाराच्या दारावर जावे लागले. होते नव्हते ते दागिने विकूण पुन्हा एकदा खरीपाची पेरणी केली. मुळात पावसाच्या लहरीपणामुळे पेरणीचा विलंब झाला. त्यातच आता कशीबशी पिके शेतात डोलायला लागली असताना विविध कीडींचा प्रादुर्भाव पिकांवर दिसून येत आहे. येत्या काळात हा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरित नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधून योग्य मार्गदर्शन घ्यावे व त्यानुसार उपाययोजना कराव्यात. जेणे करून सोयाबीनचे पीक वाचविण्यात शेतकऱ्यांना यश येईल. सायोबीन पिकांवरील चक्रभुंगा ही कीड मुख्यत: खोडाचा भाग पोखरते. याचा प्रादुर्भाव पिकांच्या सुरूवातीच्या अवस्थेत झाल्यास झाडाची पाने, फांद्या व मुख्य खोडाचा भाग सुकतो. पिके साधारणत: दीड महिन्यांची झाल्यावर चक्रभुंग्याचा प्रादुर्भाव झाल्यास झाड वाळत नाही. परंतु ज्या झाडावर कीडींचा प्रादुर्भाव झाला अशा झाड्यांना शेंगा कमी प्रमाणात लागतात. परिणामी एकूण उत्पन्नात चांगलीच घट होेते. पिकांमध्ये कीडीचा प्रादुर्भाव झाल्यास चक्रकाप तयार केलेली फांदी देठापासून काढून टाकावी अशा प्रकारच्या उपाय योजना करणे आवश्यक असल्याचे कृषी विभगाने म्हटले आहे.सोबतच कीड व्यवस्थापनासाठी आवश्यक ती औषधी फवारणी करने गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घ्यावी. आणि वेळीच त्याची अंमलबाजावणी करून कीडीची रोकथाम करावी. असे आवाहन जिल्हा कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
सोयाबीनवर चक्रभुगांचा प्रादुर्भाव
By admin | Updated: September 11, 2014 00:00 IST