पोफाळीवासीयांचा उपक्रम : एका तासात एक लाखांचा निधीउमरखेड : तालुक्यात अनेक तलाव आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पोफाळी येथील तलावातदेखील गाळ असून तो पूर्णपणे कोरडा पडला आहे. आता पोफाळी व जनुना गावातील नागरिकांनी गाळ काढण्याची सुरुवात केली आहे. नागरिकांनी पुढाकार घेताच या कामासाठी तासाभरात एक लाखांची वर्गणी गोळा झाली.उमरखेडचे तहसीलदार भगवान कांबळे यांच्या हस्ते गावकऱ्यांनी गाळ उपसण्याच्या कामाची सुरुवात केली. १९७२ साली माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांनी रोजगार हमीमधून पोफाळी येथे तलावाची निर्मिती केली. तेव्हापासून या तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साचत होते. त्यामुळे पोफाळी, वसंतनगर, कळमुला, जनुना, गगनमाळ, पळशी, अंबाळी या गावांपर्यंत सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाण्याचे स्रोत भरपूर प्रमाणात उपलब्ध झाले होते. पण गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले. तसेच तलावात गाळही साचल्याने तलावातील पाणी पूर्णपणे आटले आहे. पोफाळी, जनुना, वसंतनगरसह इतर गावांना यंदा भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गुराढोरांनाही पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे पोफाळी व जनुना गावातील सर्वपक्षीय लोकांनी मतभेद बाजूला सारून गाळ उपसण्यासाठी बैठक घेतली. या बाबत तहसीलदार भगवान कांबळे यांची भेट घेतली. त्यांनी शासनस्तरावर पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दोन्ही गावातील नागरिकांनी लोकवर्गणी केली. शनिवारी सकाळी १० वाजता जेसीबी मशीनची पूजा करून तहसीलदार यांच्या हस्ते गाळ उपसण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी रमेश चव्हाण, पोफाळीचे सरपंच नरेंद्र बरडे, पोफाळीचे ठाणेदार सरदारसिंग ठाकूर, शंकरराव तालंगकर, बळीराम चव्हाण, माणिकराव क्षीरसागर, सदाशिव ढोरे, सतीश नाईक, युवराज देवसरकर, अॅड.निरंजन पाईकराव, अॅड.सिद्धार्थ धोगडे, अरविंद दोडके, सुधाकर जाधव, दीपक नाईक, डॉ.गणेश राठोड, निरंजन चव्हाण, संदेश ठाकरे, आनंदराव बरडे, किरण काळे, शंकर शिलार, माधव पाटे, ग्रामसेवक गोडे, संजय देशमुख, पोलीस पाटील माधव गुठारे, बाळासाहेब खंदारे, एन.बी. राठोड यांच्यासह दोन्ही गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात हजर होते. (शहर प्रतिनिधी)
तलाव उपसण्यासाठी सरसावले शेकडो हात
By admin | Updated: May 8, 2016 02:07 IST