उमरखेड : बँकेला तारण असलेले हजारो क्ंिवटल धान्य वखार महामंडळाच्या गोदामातून पळविण्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकरणी केंद्र प्रमुख परिवाहक आणि धान्य व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. चातारी येथील धान्य व्यापारी श्रीधर माने यांनी सोयाबीन व हरभऱ्याचे १२ हजार ६१९ पोते धान्य वखार महामंडळाच्या गोदामात साठविले होते. या धान्यावर त्यांनी वाशिम अर्बन बँकेतून कर्ज उचलले होते. कर्जाची परतफेड न करताच आणि वखार महामंडळाचे साठवणुकीचे भाडे न देताच गोदामातून धान्य पळविले. हा प्रकार लक्षात येताच उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी वखार महामंडळातील केंद्र प्रमुख रोडगे, परिवाहक नेरकर आणि धान्य व्यापारी श्रीधर माने या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गोदामात साठविलेल्या धान्याची बाजारभावाप्रमाणे किंमत चार कोटी २० लाख ३१ हजार ६१३ रुपये एवढी आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून वखार महामंडळाच्या विश्वासाहर्तेवर प्रश्न चिन्ह लागले आहे. (प्रतिनिधी)
साडेचार कोटींचे तारण धान्य पळविले
By admin | Updated: March 1, 2015 02:02 IST