नांदेपेरा : दमदार पावसाच्या हजेरीमुळे वणी तालुक्यात सोयाबीनचे पीक बहरले आहे. मात्र पावसाअभावी वाढ खुंटल्याने कपाशीची स्थिती अद्याप चिंताजनकच आहे.यावर्षी पावसाने शेतकऱ्यांची निराशा केली. परिणामी शेतकरी बांधव निराशेच्या गर्तेत कोरड्या दुष्काळात सापडले आहे. पिकांच्या उत्पन्नात घट येण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व आशाच मावळली आहे़ दरवर्षी विजया दशमीच्या मुहूर्तावर शेतकरी कपाशीची सीतादही करीत होते. व्यापारीही याच मुहूर्तावर कापूस खरेदीला प्रारंभ करीत होते. मात्र यावर्षी विजया दशमीला कापूस निघणे अवघड झाले आहे.सुरूवातीला विलंबाने आलेल्या थोड्या पावसातच शेतकऱ्यांनी पेरणी केली. पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना दुबारच, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतरही पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडले. वणी तालुक्यातील शेतकऱ्यांना तब्बल ३0 हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी, २३५ हेक्टरवर सोयाबीन, दोन हजार २५५ हेक्टरवर तूर, तर ७३ हेक्टरवर ज्वारीची दुबार-तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतरही पुन्हा पावसाने दडी मारल्याने बळीराजा पुरता संकटात सापडला आहे. आता पोळ्यापासून पावसाने तालुक्यात दमदार हजेरी लावली आहे. मात्र तरीही कपाशीची वाढ खुंटल्याने कपाशीचे पीक अद्याप संकटातच आहे. परिणामी शेतकऱ्यांची सर्व आशा सोयाबिनवर टिकून आहे.दरवर्षी साधारणत: विजया दशमीपासून कापूस वेचणी सुरू होत होती. सीतादहीचा कापूस उच्च प्रतीचा असल्याने शेतकरी तो बाजारपेठेत विकण्यासाठी आणत होते. त्यातूनच दसरा, दिवाळी सण साजरे करीत होते. मात्र यावर्षी उशिरा पेरण्या झाल्याने आणि त्यातच पावसाने दडी मारल्यामुळे यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर कापूस खरेदी सुरू होईल अथवा नाही, याबाबत शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्येही शंका आहे़ पेरणी लांबल्याने कपाशीची बोंडे अद्याप परिपक्व होण्यास बराच कालावधी लागणार आहे़ त्यामुळे यावर्षी सीतादहीची कापूस वेचणी दिवाळीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ या सप्ताहात पोळ्यापासून वणी तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. पावसाच्या दडीने नापिकीचे संकट कायम होते़ मात्र मध्यंतरी योग्य वेळी पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन पिकाला संजीवनी मिळाली आहे. तथापि आता सोयाबिनवर उंट उळीने आक्रमण केले आहे. तसेच अवेळी पाऊस आल्याने सोयाबिनच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांमध्ये वर्तविली जात आहे़ (वार्ताहर)
शेतकऱ्यांची सोयाबीनवर आशा, कपाशी संकटातच
By admin | Updated: August 31, 2014 00:08 IST