पाच तालुक्यांवर लक्ष : मुंबईच्या सहसंचालकांनी घेतला आढावायवतमाळ : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी आता आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून प्रत्येक गावात आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांना उपचार व मानसिक आधार दिला जाणार आहे. यासाठीच आरोग्य सहसंचालक डॉ. शशिकांत जाधव आणि मानसिक उपचार उपसंचालक डॉ. रेंगे यांनी आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यवतमाळ, घाटंजी, कळंब, पांढरकवडा आणि राळेगाव या तालुक्यांमध्ये झाल्या आहेत. शेतकरी आत्महत्यांचे सत्र रोखण्यासाठी खचलेल्या शेतकऱ्यांना आधार दिला जाणार आहे. नैराश्यातील शेतकऱ्यांचा गावागावात शोध घेऊन त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार दिला जाणार आहे. गावातील कुणाची आर्थिक स्थिती कशी आहे याची जाणीव गावात काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना असते. गावातील आरोग्यदूत म्हणूनच त्या काम करीत आहेत. शासनस्तरावर आखण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या बहुतांश योजना आशांकडूनच राबविल्या जातात. आता आशांच्या माध्यमातून नैराश्याने ग्रासलेल्या शेतकऱ्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शेतकरी मित्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत चक्करवार व डॉ. शरद मनोरे समुपदेशन आणि उपचार करणार आहेत. यासाठी आरोग्य सहसंचालक आणि मानसोपचार उपसंचालकांनी सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या. (कार्यालय प्रतिनिधी)
आत्महत्या रोखण्यासाठी ‘आरोग्य’ही सज्ज
By admin | Updated: June 3, 2015 00:10 IST