मागणी सप्ताह : मानधनात अनियमितता, प्रशासनाला निवेदनयवतमाळ : थकीत मानधन मिळावे, सेवानिवृत्ती लाभ मिळावा, टीएचआर रद्द करावा आदी मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेवून निवेदन सादर केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडेही निवेदनाद्वारे प्रश्न मांडण्यात आले. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन राज्य कमिटीच्या आवाहनानुसार २० ते २७ जुलैपर्यंत मागणी सप्ताह राबविला जात आहे. या अंतर्गत बुधवारी मोर्चा काढण्यात आला. संबंधित मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळले नसल्याने युनियनने मागणी सप्ताह सुरू केला आहे. आठवडाभरात प्रश्न निकाली न निघाल्यास कामबंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ३० एप्रिल २०१४ च्या शासन निर्णयानुसार मानधनात वाढ करावी, सेवानिवृत्ती, राजीनामा किंवा मृत्यू झाल्यास सेविकेला एक लाख आणि मदतनिसांना ७५ हजार रुपये देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, अंगणवाडी केंद्रांना पुरविला जाणारा टीएचआर बेचव असल्याने जाता व गरम आहार पुरवठ्याची व्यवस्था करावी, मे महिन्यात पूर्ण पगारी सुटी द्यावी, आजारपणातील मानधन कपात बंद करावी, उपचाराचा खर्च मिळावा आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. निवेदन सादर करताना युनियनचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, जिल्हाध्यक्ष उषा डंभारे, सचिव निर्मला मोहरकर, राज्य कौन्सिल सदस्य रचना जाधव, जिल्हा संघटक गुलाब उमरतकर, सविता कट्यारमल, उज्ज्वला खांडेकर, विजया जाधव, जना महाकुळकर, सविता पवार, रेखा लांडे, प्रमिला मलकापुरे, शोभा डंभारे, रमा गजभार, संध्या कंचनवार, कांता काळे, पल्लवी रामटेके, अलका तोडसाम, मीना नेवसे, सीमा मोहबिया, पुष्पा गजभिये, सब्बा परवीन शेख आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा कचेरीवर मोर्चा
By admin | Updated: July 24, 2015 02:10 IST