वसंतनगर : गावागावात असलेल्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था आहे. अल्प मानधनात कर्मचारी दिवसभर राबत असतात. परंतु त्यांच्या भविष्याची कोणतीही तरतूद दिसत नाही. एवढेच नाही तर त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कुणी पुढाकार घेतानाही दिसत नाही.ग्रामीण भागात विविध योजना राबविल्या जातात. या योजना राबविण्यासाठी सरपंच, ग्रामसेवकांना ग्रामपंचायत कर्मचारी सहाय्यभूत ठरतो. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, दिवाबत्ती, अंगणवाडी, समाजमंदिर आदींची देखभाल या कर्मचाऱ्यांना करावी लागते. परंतु त्यांना अत्यल्प मानधनावर काम करावे लागते. एप्रिल २०१४ पासून शासनाच्या नियमानुसार दोन हजार ५०० रुपये त्यांच्या मानधनात वाढ झाली. मात्र अद्यापही मिळाली नाही. पूर्वी दोन हजार ६०० रुपये ग्रामपंचायत देत असते आणि एप्रिलपासून दोन हजार ६०० ग्रामपंचायत आणि शासनाकडून दोन हजार ५०० म्हणून पाच हजार १०० रुपये त्यांना मिळणे अपेक्षित आहे. परंतु अद्यापही २६०० रुपयावरच त्यांना काम करावे लागत आहे. वरिष्ठही त्यांच्या मागणीकडे लक्ष देत नाही. विशेष म्हणजे त्यांचे भविष्यनिर्वाह निधीचे खाते उघडण्यात आले. १०० रुपये स्वत:चे आणि शासनाचे १०० रुपये अशा पद्धतीने जमा करण्यात आले. परंतु अनेक कर्मचाऱ्यांचे खातेसुद्धा बंद पडले आहे. दिवसभर गावातील समस्या सोडवत राबायचे. परंतु शासन मात्र त्यांच्या समस्यांकडे लक्ष देत नाही. यामुळे कर्मचारी आता आंदोलनाच्या तयारीत आहे.(वार्ताहर)
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था
By admin | Updated: September 24, 2014 23:42 IST