यवतमाळ : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदान वाटपात घोळ झाला आहे. या विरोधात बेमुदत उपोषण कामबंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने दिला आहे. यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ५० टक्के शासकीय वेतन अनुदान किमान वेतन वाढीव दरानुसार देण्यात येते. जिल्हा परिषदेकडून यवतमाळ पंचायत समितीसह सर्व पंचायत समितींना वेळोवेळी हे अनुदान देण्यात आले. मात्र यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान मिळाले नाही. आॅगस्ट २०१३ पासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ झाली आहे. किमान वेतन वाढ व विशेष महागाई भत्ता देण्याचे आदेश शासनाने ३० आॅक्टोबर २०१३ लाच दिले होते. कर्मचाऱ्यांना पगार देता यावा म्हणून वाढीव वेतनाच्या ५० टक्के अनुदान आॅगस्ट २०१३ ते मार्च २०१५ पर्यंत जिल्हा परिषदेने पंचयात समितीला वितरित केली आहे. यवतमाळ तालुक्यातील बहुतांश कर्मचाऱ्यांना अपुरे अनुदान देण्यात आले. नियमित पगार, पगारवाढ, विशेष महागाई भत्ता, भविष्य निर्वाह निधी व सेवा पुस्तक अद्ययावत ठेवणे याबाबत शासनाने वेळोवेळी आदेश देऊनही पंचायत समितीमध्ये या आदेशांना केराची टोपली दाखविण्यात येत आहे. त्यामुळे २६ आॅक्टोबरपासून यवतमाळ पंचायत समितीसमोर उपोषण करण्याचा इशारा संघटनेचे राज्य सरचिटणीस लक्ष्मण मोहुर्ले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र राऊत, तालुकाध्यक्ष मोरेश्वर आदमने, तालुका उपाध्यक्ष अमोल सहारे, तालुका सचिव अरुण मेंढे यांनी दिला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन अनुदानात घोळ
By admin | Updated: October 4, 2015 00:42 IST