यवतमाळ : एकीकडे जिल्ह्यात दारूबंदीसाठी मोठी चळवळ उभी झाली आहे. महिला रस्त्यावर उतरल्या आहे. प्रत्येक तहसीलवर मोर्चा काढून दारूबंदीसाठी रणशिंग फुंकले आहे. दारूबंदीसाठी पोषक वातावरण होत असताना ग्रामपंचायत निवडणूक मात्र त्याला तडा देत असल्याचे दिसत आहे. निवडणुकीच्या काळात जिल्हा प्रशासनाने दारूबंदीचा आदेश जारी केला आहे. मात्र याचा कोणताही परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीवर होईल, असे दिसत नाही. ‘ड्राय डे’च्या काळासाठी अनेकांनी आधीपासूनच खास व्यवस्था लावून ठेवली आहे. निवडणूक असलेल्या गावात मतदानाच्या आदल्या दिवशी फेरफटका मारला तरी याचा प्रत्यय येईल. या काळात दारू रोखण्याची जबाबदारी पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाची (एक्साईज) आहे. मात्र या दोनही विभागाचे कोणतेच नियोजन दिसत नाही. दोन दिवसापूर्वी एक्साईजने जिल्ह्यातील काही ठिकाणी धाडी घातल्या. चार लाखांचा मुद्देमाल जप्त करून ३२ जणांना अटक केली. देशी-विदेशी आणि हातभट्टीची दारू उद्ध्वस्त केली. एक्साईजने केलेल्या कारवाईत पकडलेली दारू मतदानाच्या आदल्या रात्री निवडणुक असलेल्या एका गावात सापडू शकते. मात्र एक्साईजला ९९ ठिकाणी धाडी टाकाव्या लागल्या. यावरूनच त्यांचे काय नियोजन आहे, हे दिसून येते. पोलिसांची स्थितीही या पेक्षा वेगळी नाही. गावागावात कुठे दारू विकली जाते, कुठे हातभट्टी आहे याची इत्यंभूत माहिती पोलिसांना असते. परंतु कारवाई होत नाही. त्यामुळेच दारू विक्रेत्यांचे आणि पिणाऱ्यांचेही मनोबल वाढते. आता या काळात दारू रोखण्याची खरी जबाबदारी येते ती तंटामुक्त गाव समिती आणि दारूबंदी चळवळीतील कार्यकर्त्यांवर. मात्र गावगाड्याचा प्रश्न आणि निवडणुकीचे तापलेले वातावरण त्यांना अडचणीचे जाते आणि बिनबोभाट दारूचा महापूर वाहतो. (नगर प्रतिनिधी)
ग्रामपंचायत निवडणुकीत दारूबंदीला छेद
By admin | Updated: July 24, 2015 02:14 IST