प्रचंड उत्साह : मतमोजणी परिसराला जत्रेचे स्वरूप, गुलालाची उधळण करीत विजयोत्सव साजरा यवतमाळ : संपूर्ण ग्रामीण भागाचे लक्ष लागून असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. बहुतांश ठिकाणी प्रस्तापितांनीच आपले वर्चस्व कायम राखले आहे. यवतमाळ शहरानजीकच्या प्रतिष्ठेच्या पाच ग्रामपंचायतीत वडगाव वगळता इतर ठिकाणी काँग्रेस समर्थित उमेदवारांची सरशी झाल्याचे दिसून येते. वडगावमध्ये राष्ट्रवादी-भाजपा आघाडीचे वर्चस्व आहे. जिल्ह्यातील ४६१ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. तालुका मुख्यालयी मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवारांसोबतच गावकऱ्यांचीही गर्दी दिसत होती. एका-एका ग्रामपंचायतीचा निकाल लागत होता. त्यासोबतच जय-पराजयाचे पडसाद उपस्थितांमध्ये उमटत होते. यवतमाळ शहरालगतच्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षांनी आपली ताकद लावली होती. ग्रामपंचायत निवडणूक पक्ष चिन्हावर होत नसल्याने प्रत्येक पक्षाने पॅनल तयार केले होते. स्थानिक समीकरण पाहून वडगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीने भाजप सोबत आघाडी करून उमेदवार रिंगणात उतरविले. या आघाडीचे १३ उमेदवार विजयी झाले. यात भाजपाचे सर्वच सहा उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य राजू जॉन यांचा पराभव झाला. तर काँग्रेस समर्थित पॅनलला केवळ चार जागेवर समाधान मानावे लागले. ते ही त्या उमेदवारांच्या प्रभावाने घडले. याही निवडणुकीत काँग्रेसचे वडगावातील नेते अरूण राऊत यांना कमबॅक करता आले नाही. मात्र हा अपवाद वगळता काँग्रेसने इतर चार ग्रामपंचायतीत स्वत:चे संख्याबळ वाढविले आहे. येथे जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांचा प्रभाव दिसला. लोहारा येथे काँग्रेसचा प्रत्येक पदधिकारी उमेदवार स्वतंत्र वॉर्डापुरताच लढला, अशा ११ जागा त्यांनी मिळविल्या आहे. भाजपाला चार, शिवसेनेला तीन जागेवर समाधान मानावे लागले. वाघापूरमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष ढवळे यांच्या पॅनलचा सर्वांनी मिळून सफाया केला. काँग्रेस समर्थित पॅनलने नऊ जागा काबीज केल्या. यात भाजपाचे दोन सदस्य आहे. तर भारिप बहुजन महासंघाच्या दोन जागा आहेत. भोसा येथे काँग्रेसने एक हाती सत्ता मिळविली असून १७ पैकी १४ जागा घेतल्या. येथे राष्ट्रवादीला केवळ तीन जागा मिळाल्या. पिंपळगाव येथे ग्राम विकास आघाडीच्या टिपू देसाई यांनी वर्चस्व कायम ठेवत १० जागा प्राप्त केल्या. विरोधकांना केवळ सात जागा मिळाल्या आहेत. तालुक्यातील भाजपाचे नेते, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब गाडे पाटील यांना त्यांच्याच गावात आकपुरी येथे दारूण पराभवाचा सामना करावा लागला. गाडेपाटील गटाचे केवळ तीन सदस्य विजयी झाले. या उलट काँग्रेस समर्थित सर्वपक्षीय पॅनलने नऊ जागा काबीज केल्या. एकंदर सत्ताधारी भाजपाला यवतमाळ तालुक्यात काँग्र्रेस समर्थित उमेदवारांनी चांगलीच लढत दिली. त्या तुलनेत सत्ता असूनही भाजपाला विस्तार करता आला नाही. भाजपाचे स्थानिक आमदार मदन येरावार वडगाव वगळता इतर कोणत्याही ग्रामपंचायतीकडे फिरकले नाही. अशी स्थिती वाघापूर मध्ये दिसून आली. शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष ढवळे यांच्यासाठी खुद्द पालकमंत्री संजय राठोड यांनीसुध्दा बैठका लावल्या, मात्र याचा उपयोग मतपरिवर्तनात झाला नाही. एकीकडे शिवसेना शहरासह ग्रामीण भागात विस्तारासाठी धडपडत असताना कुठेच स्वतंत्र पॅनल उभी करू शकली नाही. (कार्यालय प्रतिनिधी) आकपुरीत गाडे पाटलांचे पॅनल भुईसपाट पिंपळगावात देसाईंचा टक्कापोलिसांच्या नोटीसने उत्साहावर विरजणग्रामपंचायत सदस्यांनी विजयी मिरवणूक काढू नये अशी नोटीस पोलिसांकडून उमेदवारांना बजावण्यात आली. त्यामुळे अनेकांच्या विजयी उत्साहावर विरजण पडले आहे. कुठेच डीजे, आतषबाजी, नाचगाणे असा जल्लोष करता आला नाही. केवळ गुलाल उधळून शुभेच्छा देण्यावरच समाधान मानावे लागले. ४६१ ग्रामपंचायतीचे निकाल घोषित यवतमाळ जिल्ह्यातील ४६१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल सोमवारी घोषित करण्यात आले. निकाल ऐकण्यासाठी उमेदवारासह गावकरीही मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित होते. दिग्रस, महागाव तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसून आले. तर बाभूळगाव तालुक्यात ग्रामपंचायतीत काँग्रेसने गड राखला. आर्णी, दारव्हा तालुक्यात संमिश्र कौल दिसून आला. उमरखेडमध्ये शिवसेनेने वर्चस्व मिळविले. तर भाजपाचा सफाया झाला. मारेगाव, झरी आणि पांढरकवडात काँग्रेस, भाजपा-शिवसेना समर्थित गटांचे वर्चस्व दिसून येते. या निवडणुकीने ग्रामीण भाग ढवळून निघाला होता. आता सरपंच पदाची रस्सीखेच ग्रामीण भागात पहावयास मिळणार आहे.
ग्रामपंचायतीत काँग्रेसची सरशी
By admin | Updated: July 28, 2015 03:18 IST