पुसद : सततची नापिकी व दुष्काळामुळे पुसद तालुका होरपळत आहे. त्यातच तालुक्यातील वाळवंट म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या माळपठारावरील शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था असून, येथील शेतीला लगतच्या इसापूर धरणातून पाणी द्यावे व सिंचनाची व्यवस्था करावी, जेणे करून रबी हंगामाचा आधार शेतकऱ्यांना मिळेल यासाठी पुसद तालुक्यातील माळपठारावरील ४३ गावांतील शेतकऱ्यांचा मेळावा खंडाळा येथे पार पडला. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ.आर.के. आडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून के.जी. चव्हाण होते. मेळाव्याचे आयोजक एम.जी. चव्हाण, हरिभाऊ वाढवे, सदाशिवराव नाईक, परशराम चव्हाण, एम.आर. राठोड, सुरेश राठोड उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी इसापूर धरणातील ‘बॅक वॉटर’ उपसा सिंचन योजनेव्दारे माळपठारावरील शेतीला पाणी देण्यात यावे, असा सूर लावून धरला. या शेतकरी मेळाव्यात खंडाळा, पन्हाळा, म्हैसाळा, माळआसोली, इनापूर आदी गावांसह तब्बल ४३ गावांतील कास्तकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ४३ गावातील नागरिकांची एक केंद्रीय कृती समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून शासनदरबारी गाऱ्हाणे मांडण्यात येणार असून, शासनाचे लक्ष वेधण्यात येईल व माळपठारावरील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात येतील, असे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले. या मेळाव्यासाठी एम.जी. चव्हाण, संतोष चव्हाण, अंकुश राठोड, जीवनजी आडे, शामराव मारकड, शिवाजी ढोक, चोखला जाधव, उल्हास हाके, धनसिंग राठोड, दत्तराव झिंगराजी, भीमराव नत्थुजी, काशिनाथ जाधव, राहुल इंदोरिया, सखाराम बुरकुले, परशराम भरकाडे आदींनी पुढाकार घेतला. आता काय निर्णय लागतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
माळपठार शेतीला इसापूर धरणातून पाणी द्या
By admin | Updated: January 31, 2015 23:28 IST