कळंब : नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. चार प्रमुख पक्षात होणारी निवडणूक सर्वांसाठी अस्तित्वाचा विषय ठरणारी राहणार आहे. त्यामुळे सर्वच जण शक्तीप्रदर्शनाच्या जोरदार तयारीत आहे. या नगर पंचायतीची निवडणूक १ नोव्हेंबर रोजी होत आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा या चार प्रमुख पक्षांनी निवडणुकीच्या आखाड्यात दंड थोपटले आहे. विशेष म्हणजे पूर्वीचे मित्रपक्ष स्वतंत्रपणे आपली शक्ती अजमावित आहे. पक्षाचे उमेदवार जवळजवळ निश्चित झाले आहे. त्यावर अखरेचा हात फिरविला जात आहे. असे असले तरी, काँग्रेस व भाजपाच्या उमेदवारांत अजूनही संभ्रमावस्था असल्याचे दिसून येते. संभ्रमाचा हा टेम्पो पुढील चार दिवस असाच कायम राहणार आहे. नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्वांना खेळवत ठेवले जाईल. कारण कार्यकर्ता नाराज होऊ नये किंवा त्याने बंडखोरीचा पवित्रा घेऊ नये, यासाठी ही भूमिका घेतली जात आहे.प्रस्थापित पक्ष म्हणून राष्ट्रवादी व काँग्रेसची ओळख आहे. यापूर्वी या दोन पक्षातच एकासएक टक्कर असायची. तालुक्यात त्यांनीच आतापर्यंत सत्तेचा उपभोग घेतला. निवडणुकीत उभे करण्यासाठी शिवसेना व भाजपाला उमेदवारही सापडायचे नाही. परंतु यावेळची स्थिती वेगळी आहे. या दोन्ही पक्षात उमेदवारी मिळविण्यासाठी भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रस्थापित पक्षाविरुध्द सेना-भाजपाचे चांगलेच आव्हान उभे ठाकणार आहे. १७ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत चार प्रमुख पक्षासह बीएसपी, एमआयएमचेही उमेदवार राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या पक्षाच्या उमेदवारांचा मोठा फटका कोणाला बसतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
कळंब नगर पंचायतीसाठी पक्षीय मोर्चेबांधणी
By admin | Updated: October 5, 2015 02:35 IST