आमणीचे शेतकरी : प्रत्येकी पाच हजार रुपये घेतलेआर्णी : पीक कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून आमणी येथील शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. ३७ शेतकऱ्यांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये घेण्यात आले. शिरोली (ता. घाटंजी) येथील युवकाने हा प्रकार केल्याची तक्रार फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी आर्णी पोलिसात केली. नामांकित कंपनीचा एजंट असल्याचे सांगत शिरोली येथील एका तरुणाने आमणी गावातील शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये कर्ज काढून देण्याचे आमिष दिले. कर्जासाठी पाच हजार रुपये भरावे लागतात, असे सांगून त्याने ३७ शेतकऱ्यांकडून ही रक्कम उकळली. बराच कालावधी लोटूनही या तरुणाचा पत्ता नसल्याने संबंधित शेतकऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला. दरम्यान, तो २२ फेब्रुवारीपासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. विविध माध्यमातून त्याच्याशी काही लोकांचा संपर्क झाला. तेव्हाही त्याने कर्ज मिळवून दिले जाईल, असेच सांगितले. पेरणीचे दिवस तोंडावर आलेले असतानाही पीक कर्ज उपलब्ध होत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर पोलीस ठाणे गाठले. त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदविली. या तक्रारीवर चंपत गुणाजी आडे, राजू बाळकृष्ण आडे, नामदेव गजभार, बळीराम राठोड, गोकुळ बरडे, संजय राठोड, जितेश चव्हाण, सेवादास चव्हाण, दिलीप बरडे, विजय चव्हाण आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पेरणीच्या तोंडावर काही लोक विविध कंपन्यांची नावे सांगत कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवित आहे. अशा लोकांपासून शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. खात्री करुनच आर्थिक व्यवहार करावा, अशी विनंती आमणी येथील जितेश चव्हाण यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
कर्जाचे आमिष देऊन शेतकऱ्यांची फसवणूक
By admin | Updated: June 2, 2016 00:08 IST