फुलसावंगी : लग्न लागण्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी लग्न मंडपाला अचानक आग लागली. यामुळे पाहुण्यांची धावपळ होऊन दोन महिला किरकोळ जखमी झाल्या. ही घटना उमरखेड तालुक्यातील घमापूर येथे सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान घडली.घमापूर येथील सुरेश सकरु जाधव यांच्या सीमा या मुलीचे लग्न बोरी येथील दिनेश विजय राठोड याच्यासोबत घमापूर येथे आयोजित होते. आमंत्रित पाहुण्यांनी लग्न मंडप भरला होता. काही मिनिटातच लग्न सोहळ्याला प्रारंभ होणार होता. मात्र अचानक मंडपाने पेट घेतला. तीव्र उन्हामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. प्रसंगावधान राखून गावकऱ्यांनी मंडपातील दोन सिलिंडर बाजूला नेल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत खुर्च्या, महाराजा खुर्च्या, गाद्या, एम्लीफायर आणि मंडपाचा संपूर्ण कापड जळून खाक झाला. हा मंडप विशाल जाधव यांच्या मालकीचा होता. या आगीत सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. आग लागल्याने मंडपात एकच गोंधळ उडाला. जो तो बाहेर पडण्यासाठी धडपडू लागला. यामुळे दोन महिला किरकोळ जखमी झाल्या. मंडपाला आग लागल्याचे पाहून वधूची आई आणि वडील दोघांचेही प्रकृती बिघडली. दोघांनाही उपचारार्थ दाखल करण्यात आले. (प्रतिनिधी)
घमापूर येथे लग्न मंडपाला आग
By admin | Updated: May 26, 2015 01:35 IST