गिरी रूजू : दोन महिन्यानंतर पूर्णवेळ अधिकारी, आत्तापर्यंत प्रभारावरच होता गाडावणी : अखेर वणी उपविभागीय पोलीस विभागाला उपविभागीय पोलीस अधिकारी मिळाले आहे. सोमवारी माधव गिरी येथे रूजू झाल्याने तब्बल दोन महिन्यांपासून पोलीस विभागाला पूर्णवेळ अधिकारी मिळाले आहे.गेल्या मे महिन्यात येथील तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सविता तुरेकर सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या निवृत्तीनंतर काही काळ पांढरकवडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन यांच्याकडे प्रभार सोपविण्यात आला होता. तेसुद्धा सेवानिवृत्त झाल्याने हाच प्रभार यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्याकडे देण्यात आला होता. त्यामुळे आत्तापर्यंत प्रभारावरच पोलीस विभागाचा गाडा हाकला जात होता.वणी उपविभागात वणीसह शिरपूर, मुकुटबन, मारेगाव आणि पाटण हे पाच पोलीस ठाणे आहे. यातील काही पोलीस ठाणे नक्षल प्रभावीत म्हणून शासन दप्तरी नोंद आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात कोळसा उद्योगाचे जाळे विणले गेले आहे. इतर व्यवसायही आहेत. मोठ्या प्रमाणात परप्रांतीय या परिसरात वास्तव्याला आहेत. प्रचंड प्रमाणात वाहतूकही फोफावली आहे. परिणामी हा विभाग संवेदनशील म्हणून ओळखला जातो. तरीही येथे पूर्णवेळ उपविभागीय पोलीस अधिकारी नव्हते. केवळ प्रभारावरच काम हाकलले जात होते. गेल्या काही दिवसांत वणी परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यात अनेकांचे बळी गेले आहे. काही महिन्यांपूर्वी खुनाच्याही घटना घडल्या आहेत. पोलिसांनी आरोपींना अटकही केली आहे. मात्र वरिष्ठ अधिकारी नसल्याने अनेकदा तपासाबाबत मार्गदर्शन मिळणे दुर्लभ झाले होते. प्रभारी अधिकारी सप्ताहातून काही दिवसच येथे हजेरी लावत होते. त्यामुळे पोलीस विभाग पोरका झाला होता. हक्काचा उपविभागीय पोलीस अधिकारी नसल्याने त्यांची कुचंबणा होत होती. आता सोमवारी येथे माधव गिरी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून रूजू झाले आहे. त्यामुळे वणी उपविभागाला पूर्णवेळ अधिकारी मिळाले आहे. त्यांच्यासमोर पाचही पोलीस ठाण्यांचे आव्हान आहे. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेले अवैध व्यवसाय, मटका, जुगार, अवैध दारू विक्री आदींना लगाम घालण्यासाठी आता गिरी यांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. सोबतच पोलिसांनाही मरगळ झटकून सक्रिय व्हावे लागणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
अखेर वणीला मिळाले एसडीपीओ
By admin | Updated: August 13, 2015 03:15 IST