प्रधान सचिवांकडून आढावा : शेतकरी आत्महत्या उपाययोजनायवतमाळ : गत दोन वर्षांपासून जिल्ह्यातील ३५२ गावांमध्ये राबविण्यात येत असलेल्या समन्वयिक कृषी विकास प्रकल्पाची (केम) सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी राज्याचे कृषी व पणन विभागाचे प्रधान सचिव तसेच अपर मुख्य सचिव डी.के. जैन यांनी शनिवारी जिल्हा दौरा केला. गत दोन वर्षात या प्रकल्पांतर्गत आठ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून सर्वाधिक खर्च कृषीपूरक व्यवसायावर करण्यात आल्याचे आढावा बैठकीत सांगण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षात यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्हा शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने जिल्ह्यात दोन वर्षांपासून राबविल्या जात असलेल्या कन्व्हर्जन आॅफ अॅग्रीकल्चर इंटरवेशन इन महाराष्ट्रा (केम) या प्रकल्पाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी प्रधान सचिवांनी जिल्हा दौरा केला. गत दोन वर्षात या प्रकल्पांतर्गत ३५२ गावांमध्ये उपाययोजना करण्यात आल्या. यासाठी आठ कोटी रुपयांचा खर्च झाला असून यातील सर्वाधिक खर्च कृषीपूरक व्यवसायावर करण्यात आला. या सोबतच प्रशिक्षणावरही मोठा खर्च करण्यात आला आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधान सचिवांनी तब्बल चार तास या प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. प्रारंभापासून ते आतापर्यंत किती गावांची केममध्ये अंमलबजावणी झाली याची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीतून किती निधी मिळाला याचीही माहिती जैन यांनी जाणून घेतली. प्रधान सचिवांनी मारेगाव तालुक्यातील श्रीरामपूर, बोटोणी आदी गावांना भेटी देऊन तेथील शेतकऱ्यांशी चर्चा केली. रविवारी पुन्हा केम प्रकल्पाचा आढावा घेतला जाणार आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना सूचविण्यात येणार आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर सखोल चर्चा होणार आहे.प्रधान सचिव डी.के. जैन यांच्यासोबत ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज, महसूल उपायुक्त रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, प्रभारी कृषी अधीक्षक अनिल इंगळे, झोनल अॅग्रीकल्चर रिसर्च स्टेशनचे डॉ.सी.व्ही. पाटील, जिल्हा प्रकल्प समन्वयक प्रभाकर मिश्रा उपस्थित होते. (शहर वार्ताहर)अपर मुख्य सचिवांची शेतकऱ्यांशी चर्चाराज्याचे कृषी व पणन विभागाचे प्रधान सचिव तसेच अपर मुख्य सचिव डी.के. जैन यांच्यासह ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज आणि इतर अधिकाऱ्यांनी शनिवारी तालुक्यातील मारेगाव, चोपन, श्रीरामपूर, बोटोणी या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. मारेगाव येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले लोकसंचालित महिला गटाच्या कृषी केंद्राला भेट दिली. तेथे महिलांशी संवाद साधला. त्यानंतर सर्व अधिकारी चोपन येथे पोहोचले. तेथे शेतकरी पुरुष गटाला शेती साहित्याचे वाटप करण्यात आले. यानंतर श्रीरामपूर येथे कृषी समृद्धी प्रकल्पा भेट देवून शेतकऱ्यांची चर्चा केली. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.
‘केम’ प्रकल्पावर भर
By admin | Updated: July 19, 2015 02:32 IST