लोकमत न्यूज नेटवर्कनेर : इकडे उन्हामुळे जीव व्याकूळ होत आहे, तर दुसरीकडे कोरोना महामारीच्या संकटातही गर्दीत उभे राहावे लागत आहे. ५०० रुपये काढण्यासाठी या लोकांचा जीवाशी खेळ सुरू आहे. त्याला नाईलाज आहे, असेच म्हणावे लागेल. आज अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा रोजगार थांबला आहे. घरात सरकारने दिलेले धान्य पडून असले तरी तिखटमिठाचा खर्च भागवायचा प्रश्न आहे. म्हणूनच ५०० रुपये काढण्यासाठी या लोकांची धडपड आहे.लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे उद्योग व्यवसाय थांबले आहे. याठिकाणी काम करणाऱ्या लोकांच्या हाताला काम नाही. चहाटपरी, पानठेले, फुटपाथवरील व्यवसाय आणि इतर ठिकाणी असलेल्या कामगारांचा जगण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सुरुवातीचे काही दिवस निभावले गेले. आता मात्र त्यांना जगण्याची चिंता लागली आहे. घरातील एखाद्या व्यक्तीला मिळत असलेला निराधारचा निधी, जनधनच्या खात्यात पडलेले ५०० रुपये या भरवशावर कसेतरी दिवस त्यांना ढकलावे लागत आहे.जनधन आणि निराधारचा पैसा काढण्यासाठी बॅका आणि मिनी एटीएमपुढे लांबच्या लांब रांगा आहे. सकाळपासूनच रांगेत उभे असलेल्या शेवटच्या व्यक्तीला घरी जाण्यासाठी संध्याकाळ होत आहे. या दिवसभरात त्याला घोटभर पाणीही मिळत नाही, जेवण तर दूर. अन्न-पाण्याविना रांगेत राहणाºया या गरजूंच्या आरोग्याचा प्रश्नही आता निर्माण होण्याची भीती आहे.तालुक्यातील निराधारांच्या खात्यात दरमहा एक हजार रुपये पडतात. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकारने जनधनच्या खात्यात ५०० रुपये टाकले. सोबतच उज्ज्वला गॅसची सबसिडी आणि प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत दोन हजार रुपयांचा हप्ता आला आहे. या रकमा काढण्यासाठी नेर शहरातील मध्यवर्ती बँक, स्टेट बँक, स्टेट बँकेचे ग्राहक सेवा केंद्र आदी ठिकाणी गर्दी होत आहे.पैसे काढण्यासाठी प्रत्यक्ष खातेदाराला हजेरी लावावी लागते. अनेक खातेदार ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना बँक किंवा ग्राहक सेवा केंद्रापर्यंत पोहोचणे कठीण आहे. परंतु पैशांची गरज असल्याने जीवावर उदार होऊन त्यांना तेथे पोहोचावे लागत आहे. अशा लोकांसाठी घरपोच पैसा पोहोचण्याची व्यवस्था व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.बँकांचीही ढीलव्यवहार करण्यासाठी बँकेत आलेल्या लोकांनी नियमांचे पालन करावे यासाठी बँकांकडूनही ठोस असे प्रयत्न केले जात नाही. अधिकाऱ्यांकडून या लोकांना कुठलीही समज दिली जात नाही. या प्रकारात सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णत: फज्जा उडत आहे. पोलीस असेल त्याच ठिकाणी काही प्रमाणात पालन होत आहे. इतर ठिकाणची गर्दी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
पाचशे रुपयांसाठी जीवाशी खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST
लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे उद्योग व्यवसाय थांबले आहे. याठिकाणी काम करणाऱ्या लोकांच्या हाताला काम नाही. चहाटपरी, पानठेले, फुटपाथवरील व्यवसाय आणि इतर ठिकाणी असलेल्या कामगारांचा जगण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सुरुवातीचे काही दिवस निभावले गेले. आता मात्र त्यांना जगण्याची चिंता लागली आहे. घरातील एखाद्या व्यक्तीला मिळत असलेला निराधारचा निधी, जनधनच्या खात्यात पडलेले ५०० रुपये या भरवशावर कसेतरी दिवस त्यांना ढकलावे लागत आहे.
पाचशे रुपयांसाठी जीवाशी खेळ
ठळक मुद्देनिराधारांची व्यथा : चिक्कार गर्दी व उन्हातही रांगा, धान्य मिळते पण तिखट-मिठाचा प्रश्न