यवतमाळ : लाडखेड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नारकुंड व बोरजई या गावांमध्ये कित्येक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री सुरू आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कारवाई झाली नाही. यामुळे संतापलेल्या महिलांनी बुधवारी थेट पोलीस अधिक्षक कार्यालयावर धडक दिली. तिवसा गावामध्ये दारूबंदी करण्यात आली. बोरजईमध्ये दारूविक्री हद्दपार झाली. यानंतरही या गावांना लागून असलेल्या नारकूंडमध्ये अवैधरित्या दारू बनविली जाते आणि विकलीसुद्धा जाते. यातून दारूबंदी करणाऱ्या गावांना मोठा फटका बसत आहे. दारूबंदी झालेल्या गावातील नागरिक याठिकाणी दारू पिण्यासाठी येतात. परिणामी दारूबंदीचा तिळमात्रही फायदा झाला नसल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. यातून गावांमध्ये व्यसनाधिनता वाढून भांडणे आणि हाणामारीच्या घटनांमध्येसुद्धा वाढ झाल्याची माहिती या गावांमधील महिलांनी दिली. तसेच शालेय विद्यार्थीसुद्धा व्यसनांच्या आहारी जात असल्यामुळे भावी पिढीचे भवितव्य धोक्यात आले आहे. याबाबत त्वरित कारवाई करून या परिसरातील अवैध दारूविक्री बंद करण्याच्या मागणीचे निवेदन महिलांनी अपर पोलीस अधिक्षक जानकीराम डाखोरे यांना दिले. यावेळी पार्वताबाई खोपरे, मंदा लडके, तुळसाबाई गारपगारे, कमलाबाई डेहनकर, वंदना पारधी, कवडी मुरझडे, बायजा खडसे, मिरा देवकर, निर्मला चिरबंदे, नावला घोटेकर आदींसह असंख्य महिलांची उपस्थिती होती. (शहर वार्ताहर)
दारूबंदीसाठी महिलांची एसपी कार्यालयावर धडक
By admin | Updated: September 24, 2014 23:43 IST