तलावफैलातील घटना : आरोपी पसार यवतमाळ : जुन्या वादात दोन तरुणांमध्ये झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी एकाने दुसऱ्याच्या वडिलाचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना यवतमाळ शहरातील तलावफैल परिसरात सोमवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर आरोपी पसार झाला.अविनाश आनंदराव मेश्राम (४२) रा. तलावफैल असे मृताचे नाव आहे, आरोपी प्रदीप मधुकर नंदेश्वर (३०) रा. तलावफैल याने अविनाशवर चाकूने सपासप वार करून जागीच ठार केले. दहा दिवसापूर्वी अविनाश यांचा मुलगा आणि आरोपी प्रदीप यांच्यात बसस्थानक चौकातील एका हॉटेलसमोर वाद झाला. या वादात हाणामारी होऊन प्रकरण शहर पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यावरून पोलिसांनी तिघांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याच घटनेचा वचपा काढण्यासाठी प्रदीपने सोमवारी रात्री अविनाश मेश्राम याच्यासोबत वाद घातला. या वादात प्रदीपने अविनाशवर चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडून अविनाशचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. तोपर्यंत या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान या घटनेतील आरोपी पसार झाला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे. पोलिसांना प्रदीप नंदेश्वर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शहरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दोन तरुणांच्या भांडणात वडिलांना जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
मुलांच्या भांडणावरून वडिलांचा खून
By admin | Updated: April 27, 2016 02:34 IST