यवतमाळ : वनीकरण आणि वनविकास महामंडळातील योजनेवर रोजंदारी कामगार म्हणून राबणाऱ्यांना सेवेत नियमित करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. यवतमाळ वन विभागात काम करणाऱ्या रोजंदारी मजुरांना मात्र त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात येत आहे. येथील विभागीय व्यवस्थापकाच्या मनमानी विरोधात रोजंदारी वन कामगारांनी उपोषण सुरू केले आहे. वन विभागाच्या १६ आक्टोबर २०१२ च्या आदेशानुसार रोजंदारी कामगाराना सेवेत नियमित करणे अपेक्षित होते. यवतमाळ वनक्षेत्र वगळता इतर ठिकाणी कामावर नसलेल्याही रोजंदारी कामागारांना सेवेत नियमित करण्यात आले आहे. चंद्रपूर प्रदेश कार्यालयाने मार्कडा, बल्लारशा, आलापल्ली या वन प्रकल्प विभागातील कामावरून बंद झालेल्या मात्र शासन निर्णयानुसार पात्र असलेल्या ३४ वन कामागारांना सेवेत नियमित करण्यात आले. याऊलट यवतमाळ वन विभागातील व्यवस्थापकाने आपल्या वरिष्ठांची दिशाभुल करणारी माहिती दिली. त्यामुळे पात्र असूनही ३४ वन कामागारांना सेवेत नियमित करण्याची संधी मिळाली नाही. या अन्याया विरोधात या सर्व कामागारांनी यवतमाळ विभागाच्या उपवनसंरक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. यामध्ये बाबाराव मेंढे, रमेश डबले, दशरथ दांरूडे, संतोष नेहारे हे कामगार उपोषणास बसले आहे. त्यांना राजू मेश्राम, योगिराज भोवते, लक्ष्मण लाकडे, दिलिप पोहेकर, गजानन देशपांडे, राजू डेरे, अनंता पारधी, दिलिप चौधरी, अशोक मेश्राम, गजानन चावरे, दिलिप तेलंगे, वाघू आत्राम, दादाराव भाले, अशोक कासार, बाबाराव मुनेश्वर, भिमराव राठोड, बापुराव राठोड, दशरथ रामटेके आदी कामगारांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे. (कार्यालया प्रतिनिधी)
डीएफओ कार्यालयापुढे वन कामगारांचे उपोषण
By admin | Updated: November 18, 2014 23:04 IST