किनवट : शेतात पाणी देण्यासाठी जात असलेल्या ४४ वर्षीय शेतकऱ्याला अज्ञात इसमाने दगड मारून ठार केले. ही घटना तालुक्यातील बोधडी(बु) येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. बोधडी येथील दिगांबर शंकरराव डवरे हा शेतकरी पिकाला पाणी देण्यासाठी पहाटेच्या सुमारास घरून निघाला होता. दरम्यान, अज्ञात इसमाने त्याच्याशी झटापट केली व नंतर डोक्यात दगड मारून जखमी केले. अतीरक्तस्त्राव झाल्याने दिगांबरचा मृत्यू झाला. त्यांचा खून कोणी व कोणत्या कारणासाठी केला याचा शोध किनवट पोलीस घेत आहे. दिगांबरच्या मागे पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. याप्रकरणी किनवट पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ७ आॅक्टोबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी बोधडी येथील दारू दुकान फोडले. दिगांबरचा खून ज्या ठिकाणी झाला तेथे दारूचे दोन बॉक्स आढळून आले. त्यामुळे चोरट्यांनीच दिगांबरला मारले का, या दिशेनेही पोलीस तपास सुरू आहे. घटनास्थळी प्रभारी डीवायएसपी पद्माकर चव्हाण, पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांनी भेट दिली. अधिक तपास जारी करण्यात आला आहे. (वार्ताहर)
बोधडी येथे शेतकऱ्याचा खून
By admin | Updated: October 9, 2015 00:28 IST