आपल्या पिकाचा पेरा आपणच भरा, हा उद्देश शासनाचा चांगला असला, तरी प्रत्येक शेतकऱ्याकडे अँड्राइड मोबाइल राहतोच असे नाही. ज्या शेतकऱ्याकडे मोबाइल नाही, अशा शेतकऱ्यांनी काय करावे, पिकाची नोंद करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे. जे शेतकरी पीक पाहणी ॲपमध्ये पिकाची नोंद करणार नाही, त्यांचा सातबारा कोरा राहील, तसेच कोणताही लाभ मिळणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सणासुदीचा काळात एकही नगदी पीक घरी आले नाही. त्यातच पुन्हा मोबाइल खरेदी कुठून करायचा, अशा अनेक समस्या शेतकऱ्यांसमोर आहे. ज्या शेतकऱ्यांकडे मोबाइल आहे, असे शेतकरी शेतात जाऊन पीक नोंदणीसाठी ॲपवरून पिकाची नोंदणी करताना दिसून येत आहे. मात्र, पिकाची नोंदणी करताना हे ॲप काम करीत नसल्याने, पूर्ण दिवस शेतकरी कामे सोडून केवळ ॲपच्याच ध्यानी असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तलाठी, कृषी सहायक असताना शेतकऱ्यांच्या मागे फालतू व्याप लावल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.
पीक पाहणी ॲपमध्ये अडकला शेतकऱ्यांचा पीकपेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:48 IST