पुसद : दोन वर्षांपासून सातत्याच्या नापिकीने शेतकरी अडचणीत आले असून त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची मुले आज शिक्षणापासून वंचित दिसत आहे.पुसद तालुक्यातील सिंगरवाडी या माळपठारभागातील शेतकरी कैलास कनिराम चव्हाण यांचेकडे पाच एकर सात गुंठे जमीन असून आज पेरणी व मुलाच्या शिक्षणाकरिता काहीच पैसे नाहीत. त्यांना तीन मुले असून दोन मुले अभियांत्रिकीला असून एक मुलगा बीए द्वितीय वर्षाला शिकत आहे. तीनही मुलाच्या शिक्षणाकरिता लागणारा पैसा २०१३-१४ मध्ये स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा पुसदचे पीक कर्ज घेतले होते. दोनही वर्षापासून कर्जाची परतफेड होऊ शकली नाही. मुलांच्या शिक्षणासाठी पैसा नाही त्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. मला आत्महत्याग्रस्त म्हणून देण्यात येणारी नुकसानभरपाईची रक्कम माझ्या मुलांच्या शिक्षणाकरिता देण्यात यावी, अशी विनंती कैलास चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.एक महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली होती. त्याची प्रशासनाच्यावतीने दखल घेण्यात आली नसल्याने मला ही भूमिका घ्यावी लागत आहे, असे कैलास चव्हाण यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांची मुले शिक्षणापासून वंचित
By admin | Updated: August 13, 2015 03:17 IST