उमरखेड : विकासाचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या नगरपरिषदेतील पदाधिकाऱ्यांनी शहराकडे कमालीचे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अस्वच्छतेसह शहरात विविध समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. या विरोधात नागरिक वारंवार ओरड करीत असले तरी नगरपरिषद प्रशासन मात्र लक्ष द्यायला तयार नाही. शहरात बनविण्यात आलेल्या सिमेंट नाल्या, रस्त्याच्या कामातील अनियमितता, शहरातील विविध प्रभागातील स्वच्छता आदी समस्या गेल्या अनेक दिवसांपासून कायम आहे. आता या समस्या ऐरणीवर आल्या आहे. त्याविरोधात जनक्षोभ वाढत असून नगरपरिषदेने वेळीच दखल न घेतल्यास मोठे आंदोलन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या संदर्भात महिला आघाडी ग्राहक संरक्षण संस्थेने नुकतेच नगराध्यक्षांना निवेदनसुद्धा दिले आहे. विशेष म्हणजे दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात विविध कामे सुरू आहेत. ही विकास कामे योग्य दिशेने व्हावी, यासाठी महिला आघाडी ग्राहक संरक्षण संस्थेने प्रयत्न सुरू केले आहे. शहरात बनविण्यात आलेल्या सिमेंट नाल्या निकृष्ठ बांधण्यात आल्या आहे. कोणत्याही क्षणी ढासळतील, अशी या नाल्यांची स्थिती आहे. सिमेंट रस्ता कामामध्ये अनियमितता असल्याने गिट्टी, मुरूम अल्प प्रमाणात वापरण्यात आले. त्यातून हे रस्ते थातूरमातूर पद्धतीने बनविण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. नवीन गल्ली व वॉर्डात डांबरी रस्ते करण्यात आले. त्या कामात आॅईलचे प्रमाण डांबरात वापरून गैरप्रकार झाला, असे म्हटले आहे. शहरातील नाल्यांची नियमितपणे सफाई होत नाही. शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. यावर आवर घालणे गरजेचे आहे. कचरागाड्या सामान्य लोकांच्या घरांपर्यंत जात नाही. काही प्रमुख वॉर्ड सोडले तर कित्येक वॉर्डात साफसफाई होत नाही. नाथनगर, रेणुकानगर आणि आदर्शनगर या ठिकाणी वेळेवर पाणीपुरवठा केला जात नाही. लिकेजेस अद्यापही काढण्यात आलेले नाही. रेणुकानगरात खड्डे खोदून ठेवले. मात्र काम पूर्णत्वास गेलेले नाही. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने शहरात धूर फवारणी होणे अत्यंत गरजेचे आहे. ग्राहक संरक्षण संस्थेकडून अनेकदा पाठपुरावा केल्यानंतरही उपाययोजना होत नाही, असे महिला आघाडी ग्राहक संरक्षण संस्थेच्या जिल्हाध्यक्ष वंदना चव्हाण, तालुकाध्यक्ष ज्योती भंडारे, शहराध्यक्ष सुजाता बोलजवार, विजयंता टिंगरे, सुचिता वाघ, अनिता जोशी, ज्योती गिरी, सीमा झाडे, उज्ज्वला आडे, नंदा कदम, माया बोंतले, सुचिता सुरोसे, वंदना बोंडे, प्रा.डॉ. उषा पाटील यांनी म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)
उमरखेड समस्यांच्या विळख्यात
By admin | Updated: April 19, 2016 06:14 IST