यवतमाळ : शेतकर्यांना आपल्या शेतजमिनीचा पोत कळावा म्हणून डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने फिरती प्रयोगशाळा गावात पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि माती परीक्षणाची वाहने जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचली. मात्र तज्ज्ञ मार्गदर्शक नसल्याने ही वाहने धूळ खात पडली आहेत. यवतमाळ जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा होतो. जवळपास साडेचार लाख शेतकरी दरवर्षी शेती कसतात. शेतीमध्ये तीच ती पारंपरिक पिके घेतली जातात. अधिक उत्पादनासाठी कृषी सेवा केंद्र संचालक शेतकर्यांना खताची अमाप मात्रा देण्याचा सल्ला देतात. यातून शेतकर्यांना आर्थिक बजेट बिघडतो. उत्पादनही होत नाही. याचे मूळ कारण शोधण्यासाठी शेतकरी कधीच आपल्या शेतजमिनीची पोत तपासत नाही. यामुळे या संपूर्ण प्रकारावर मात करता यावी म्हणून डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रत्येक जिल्ह्यांना माती परिक्षणाचे फिरते वाहन उपलब्ध करून दिले. यात यवतमाळचाही समावेश आहे. ही वाहने माती परिक्षणासाठी अद्यावत तंत्रज्ञानासह सज्ज आहे. या फिरत्या माती परिक्षण केंद्रामध्ये गावातील शेतकर्यांना तत्काळ मातीची पोत तपासून दिली जाणार आहे. परंतु या फिरत्या पथकाला तज्ज्ञच नाही. यामुळे गत चार महिन्यांपासून ही वाहने उभी आहेत. शेतजमिनीची पोत तपासून पीक निवडल्यास शेतकर्यांना अधिक उत्पादन घेण्यास मदत होवू शकते. मात्र माती परिक्षणाची सोयच नसल्याने त्यांच्या निर्णयात अडथळे येत आहे. माती परिक्षण वाहनासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला आहे. केवळ तज्ज्ञाअभावी हे वाहन मातीमोल झाले आहे. तज्ज्ञ नियुक्तीची जबाबदारी कृषी विद्यापीठाची आहे. सध्या तर या वाहनावर चालकही नसल्याने हे वाहन केवळ नावापुरतेच असल्याचे दिसून येते. शेतकर्यांसाठी विविध योजना शासनाकडून घोषित करण्यात येत असल्या तरी त्या प्रत्यक्षात राबविणार्यांच्या इच्छाशक्तीअभावी या योजना केवळ कागदांवरच दिसून येतात. प्रत्यक्षात अशा योजनांचा कोणताही लाभ शेतकर्यांना होताना दिसत नाही. योजनांची सुरवातीला मात्र मोठय़ा प्रमाणात प्रसिद्धी केली जाते. नंतर या योजना कुठे दबतात हे कुणालाही माहिती नसते. त्यामुळे शेतकर्यांमध्ये रोष निर्माण होणे सहाजिक आहे. (शहर वार्ताहर)
तज्ज्ञाविना फिरती प्रयोगशाळा
By admin | Updated: May 22, 2014 01:30 IST