पुसद : आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यावर एकदाच वरूणराजा प्रसन्न झाला. गेल्या तीन दिवसांपासून पुसद तालुक्यात संततधार पाऊस कोसळत आहे. गत २४ तासात ६० मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाने कापूस, सोयाबीन पिकांना नवसंजीवनी मिळाली असून पूस धरणातही ४० टक्के जलसाठा झाला आहे. यंदा हवामानाचे सर्व अंदाज खोटे ठरवित पावसाने दोन महिने दडी मारली. रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू ही पावसाची नक्षत्रे कोरडी गेली. शेतकऱ्यांची चिंता वाढली. मात्र गत दहा दिवसांपासून पावसाचे आगमन झाले. सर्वत्र पाऊस आल्याने नदी-नाल्यात पाणी वाहू लागले. विहिरी व हातपंपाच्या पाण्याची पातळी वाढली. पूस नदीवरील प्रकल्पात १५ आॅगस्टपर्यंत १८ टक्के जलसाठा होता. याची झळ पुसदकरांना बसणार होती. मात्र आता समाधानकारक पावसाने पूस धरणात तब्बल ४० टक्के पाणीसाठा झाला असल्याची माहिती उपविभागीय अभियंता मनोहर चव्हाण यांनी दिली. गेल्या २४ तासापासून सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळत आहे. २४ तासात तब्बल ६० मिमी पाऊस कोसळल्याची नोंद आहे. आतापर्यंत ३५१ मिमी पाऊस तालुक्यात कोसळल्याचे तहसील कार्यालयातील भाऊ चंद्रवंशी यांनी सांगितले. या पावसाने तालुक्यातील कापूस, ज्वारी, सोयाबीन या पिकांना संजीवनी मिळाली असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. शेतकरी लक्ष्मणराव जाधव म्हणाले, अलिकडचा पाऊस समाधानकारक असून पिकांना पोषक आहे. दुबार पेरणी केलेल्या पिकांनाही नवसंजीवनी मिळणार असल्याचे वरुड येथील शेतकरी संभाजीराव टेटर यांनी सांगितले. वृत्त लिहेस्तोवर पुसद तालुक्यात संततधार पाऊस सुरूच होता. या पावसामुळे कोरडे पडलेले नदी-नाले खळखळून वाहत आहेत. (प्रतिनिधी)
सर्वत्र संततधार, कापूस, सोयाबीनला संजीवनी
By admin | Updated: September 1, 2014 00:16 IST