यवतमाळ नगरपरिषद : सर्वसाधारण सभेवर उमटणार पडसाद, स्थानिक आमदारांची प्रतिष्ठा पणाला यवतमाळ : नगरपरिषदेच्या विषय समिती आणि सभापती निवडीवरून चांगलीच रस्सीखेच सुरू असून यामुळे नगर परिषदेत राजकीय वातावरण तापले आहे. १५ डिसेंबर रोजी होत असलेल्या सर्वसाधारण सभेवरही याचे सावट आहे. विशेष म्हणजे भाजपाचे संख्याबळ अधिक असतानाही महत्वाची पदे मात्र राष्ट्रवादीकडे आहे. आतापर्यंतच्या निवड प्रक्रियेत राष्ट्रवादीच वरचढ ठरली. त्यामुळे स्थानिक आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. नगरपरिषदेच्या इतिहासात कधी नव्हे इतकी अस्थिर परिस्थती मागील चार वर्षात निर्माण झाली आहे. सार्वत्रिक निवडणुकीपासूनच सर्वच पक्षाच्या नगरसेवकांत गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे येथे पक्षनिष्ठा कोणातच दिसून येत नाही. आपल्या हितसंबधासाठी कुणाशीही जुळवून घेण्याचा प्रघात येथे पडला आहे. त्यामुळे सत्ते बसूनही सातत्याने नगराध्यक्षाभोवती अस्थिरतेचे वातावरण राहिले आहे. १७ डिसेंबरला होणाऱ्या विषय समित्यांच्या निवडप्रक्रियेत अनेक राजकीय समीकरणे दडले आहेत. नगपरिषदेत भाजपाचे १६ सदस्य आहेत. काँग्रेसचे ११, राष्ट्रवादी सहा, बसपा चार, अपक्ष तीन , शिवसेना एक असे पक्षीय बलाबल आहे. मात्र हे संख्याबळ कोणत्याच पक्षाला टिकवता आले नाही. भाजपासह सर्वच पक्षामध्ये दोन गट आहेत. यातील बहुतांश सदस्यांवर अपात्रतेच्या याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. आपसातील संबध टोकाला गेलेले असताना ही निवडणूक होत आहे. त्यामुळे स्थानिक आमदार मदन येरावर यांना पक्षाच्या नगरसेवकांना एकत्र आणण्याची कसरत करावी लागणार आहे. अन्यथा विषय समितीसाठी वेळेवर बंड पुकारण्याची तयारीही दुसऱ्या गटाकडून सुरू आहे. भाजपा, राष्ट्रवादी, बसपा आणि शिवसेना नगरसेवकांनी मिळून तयार केलेली शहर विकास आघाडी खिळखिळी झाली आहे. यातून एक मोठा गट माजी नगराध्यक्ष योगेश गढिया यांच्याकडे आहे. त्यासोबतच विरोधी काँग्रेस नगरसेवकांतही फूट पडली आहे. नगरपरिषदेतील दुसरे मात्तबर बाळासाहेब चौधरी यांनी आपल्या समर्थकांचा वेगळा गट केला आहे. या प्रक्रियेत आपल्या समर्थक सदस्यांसाठी पद मिळविण्याकरिता त्यांच्याकडूनही प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. विद्यमान नगराध्यक्ष सुभाष राय यांनासुध्दा आपल्या पाठीराख्यासाठी समिती निवडावीच लागणार आहे. अपक्ष नगरसेवकांची संख्या केवळ तीन असली तरी त्यांचे नेते अफसर शाहा यांचीही भूमिका निणार्यक ठरणारी आहे. अशा स्थितीत कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपातून नगराध्यक्ष पदासाठी प्रचंड महत्वाकांक्षा घेऊन असलेले प्रवीण प्रजापती यांच्याकडूनही समिती निवडण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विधान परिषद निवडणूक जवळ असल्याने वरिष्ठ सभागृहातील आमदारही परिस्थिती कशी अनुकूल करता येईल याचा डाव मांडण्यासाठी प्रयत्नरत राहणार आहेत. एकंदर सर्वच घटक विषय समितीसाठी प्रत्यक्ष सक्रिय दिसत नसले तरी गुप्त हालचालींना वेग आला आहे. नगरपरिषदेतील कोणतीच प्रक्रिया ही घोडेबाजार केल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे याही निवडणुकीत इच्छुकांची भाऊ गर्दी झाल्यास घोडेबाजार होणार हे निश्चित मानले जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
विषय समित्यांवरून नगरपरिषदेत वातावरण तापले
By admin | Updated: December 14, 2015 02:30 IST