दुसरा दिवस : काही अतिक्रमणधारकांना दिला अवधी, पावसाळ्यानंतर पुन्हा मोहीमवणी : शहरातील जत्रा मैदानावरील अतिक्रमण सोमवारी काढल्यानंतर मंगळवारी दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होती. मंगळवरी फुटपाथवरील अतिक्रमण नगरपरिषदेने काढले, तर गांधी चौक व शहरातील काही अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्यासाठी पुन्हा तीन दिवसांचा वेळ देण्यात आला. सोमवारी सकाळी ११ वाजता शहरातील दीपक टॉकिज चौकातील अतिक्रमण बुलडोजरच्या सहाय्याने काढण्यात आले. त्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यावर अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण काढण्यात आले. मंगळवारी नगरपरिषदेने प्रथम टिळक चौक, खाती चौक, शिवाजी चौक, अणे चौक, कमान चौक, गांधी चौक, तुटी कमान, नटराज चौक, गाडगेबाबा चौक, भगतसिंग चौक, सावरकर चौक, सर्वोदय चौक व टागौर चौकातील रस्त्यावर आलेले अतिक्रमण बुलडोजरच्या सहाय्याने काढले. या मार्गावरील पान टपरी, चहा कॅन्टीन, हॉटेलचे अतिक्रमण हटविण्यात आले. मात्र आजही पक्के असलेले अतिक्रमण ‘जैसे थे’ ठेवून अतिक्रमणधारकांना तीन दिवसात अतिक्रमण काढण्याची सवलत देण्यात आली. मंगळवारी दुपारी २ वाजता अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम काही वेळ थंडावली होती. मात्र पावसाने विश्रांती घेताच पुन्हा अभियंता दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली महालक्ष्मी हॉलसमोरील अतिक्रमण, भाजीमंडी परिसर, हमीद चौक, श्याम टॉकिज, विराणी टॉकिज व टिळक चौकातील अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्यासाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात आला. मंगळवारीसुद्धा नगरपरिषदेने केवळ कारवाईचा देखावा म्हणून सर्वसामान्य व गरिबांचेच अतिक्रमण हटविले. मात्र ज्यांनी अतिक्रमीत जागेवर पक्के बांधकाम केले, अशांना तीन दिवसांचा अवधी देऊन भेदभाव केल्याचा, आरोप सामान्य अतिक्रमणधारकांकडून होत आहे.अतिक्रमण काढताना एक जेसीबी मशीन, साहित्य गोळा करण्यासाठी एक ट्रॅक्टर नगरपरिषदेने आणले होते. मात्र नगरपरिषदेने मंगळवारीसुद्धा जप्तीची कोणतीही कारवाई केली नाही. अतिक्रमण काढताना पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. अतिक्रण काढताना केवळ फुटपाथवरीलच अतिक्रमण काढण्यात आले व पक्के बांधकाम केलेल्या अतिक्रमणधारकांना नगरपरिषदेने संरक्षण दिल्याने फुटपाथवरील व्यावसायीक नगरपरिषदेविरूद्ध रोष व्यक्त करीत होते. अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून नगरपरिषदेने तीन जेसीबी, चार ट्रॅक्टर व विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी बोलाविले होते. जेसीबी व ट्रॅक्टरसाठी नगरपरिषदेने हजारो रूपये खर्च केले. दोन दिवस सकाळ, सायंकाळ कर्मचाऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्थाही केली होती. या दोन दिवसाच्या अतिक्रमण मोहिमेमध्ये हजारो रूपये खर्चूनही अतिक्रमण पूर्णत: काढण्यात आले नाही. (प्रतिनिधी)मोहिम केवळ दिखाव्यापुरतीच काय ? ४नगरपरिषदेने सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम केवळ दिखाव्यापुरतीच तर नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. अतिक्रमण हटाव पथकाने केवळ कच्चे अतिक्रमण हटविले आहे. ज्यांनी अतिक्रमीत जागी पक्के बांधकाम केले, त्यांना मात्र हातही लावला नाही. त्यामुळे कच्चे बांधकाम करणाऱ्यांनाच लक्ष्य केल्याचे दिसून येते. उलट पक्के बांधकाम करणारे अतिक्रमणधारक निर्धास्त झाले आहे. हा भेदभाव का केला जात आहे, असा प्रश्न सामान्य अतिक्रमणधारकांना पडला आहे. आपण कच्चे बांधकाम करून चूक तर केली नाही ना, असा प्रश्न आता त्यांना पडला आहे.शहरातील अतिक्रमण ‘जैसे थे’च४सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या जागेवरही अनेकांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण अद्याप ‘जैसे थे’च आहे. शहराच्या अनेक भागात असे अतिक्रमणधारक अद्याप दुकाने थाटून बसले आहेत. हे अतिक्रमण कधी हटणार, असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. किरकोळ अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण काढून केवळ थातूरमातूर ही मोहीम उरकण्यात येत आहे. आता पावसाला सुरूवात झाल्याने पुन्हा ही मोहीम थंडावणार आहे. त्यामुळे ही मोहीन नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे.
फुटपाथवरील अतिक्रमण हटविले
By admin | Updated: June 17, 2015 02:08 IST