अव्वाच्या सव्वा देयके : युनिट वाढविण्यासाठी फोटो रिडिंगला ‘ब्रेक’यवतमाळ : जिल्ह्यात महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांची खुलेआम लूट सुरू आहे. उन्हाळ्यात तासन्तास वीज पुरवठा बंद ठेऊनही जून महिन्यात ग्राहकांच्या हाती अव्वाच्या सव्वा दराची देयके पडली आहेत. जादा युनिटचे एकत्र बिल देता यावे, त्याला वाढीव दर लावता यावा म्हणून अनेक भागात गेल्या महिन्यात फोटो मीटर रिडींगला ब्रेक देण्यात आला. गेल्या महिन्यात सरासरी देयक पाठवून या महिन्यात थेट सात ते आठ हजारांची देयके ग्राहकांना पाठविण्यात आली आहे. त्यामुळे वितरण कंपनीविरोधात ग्राहकांमध्ये तीव्र संताप आहे. महावितरणच्या कारभाराला यवतमाळ जिल्ह्यातील जनता पुरती त्रासली आहे. वीज अभियंते आणि त्यांची अधिनस्त यंत्रणा मनमानी पद्धतीने वागत आहे. अधीक्षक अभियंत्यापासून कुणीच जनतेच्या समस्यांवर गंभीर नाही. भारनियमनाचा अधिकृत कार्यक्रम नसला तरी छुप्या पद्धतीने आणि तांत्रिक कारणे पुढे करून तो यवतमाळ शहरातसुद्धा राबविला जात आहे. नियमित वीज देयक भरणाऱ्या ग्राहकांनाही तासन्तासाच्या वीज पुरवठा खंडाचा सामना करावा लागत आहे. आता पावसाळ्यात तर वितरण कंपनीची वीज बचतीची आयतीच सोय होणार आहे. हवेची झुळूक आली तरी वीज पुरवठा खंडित करण्याचा वितरणचा पायंडा पडला आहे. त्या आड मोठ्या प्रमाणात वीज बचत केली जाते. अभियंते म्हणतात, कुलर वापरला नाही काय?जून महिन्यात विजेची देयके हाती पडताच नागरिकांना जणू शॉक बसला. प्रत्येक ग्राहकाला एप्रिल-मे महिन्याच्या तुलनेत दुप्पट ते तिप्पट देयक देण्यात आले आहे. वाढीव देयकाबाबत विचारणा केली असता वितरण कंपनीकडून ‘उन्हाळ्यात तुम्ही पंखे, कुलर, फ्रीज चालविले नाही का?’ असा उद्धट सवाल विचारुन आपल्या वाढीव देयकाचे समर्थन केले जात आहे. दोन महिन्याचे एकत्र बिल आकारण्याकडे वितरण कंपनीचा कल राहतो. कारण दोन महिन्याचे युनिट एकत्र मोजले जाऊन त्याला वाढीव दर लावला जातो. पर्यायाने वितरण कंपनीच्या महसुलात छुप्या पद्धतीने आपसुकच भर पडते. महसूल वाढीच्या या छुप्या फंड्याची वीज कंपनीतच दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. वितरणचे अभियंते व आर्थिक एक्सपर्टच्या डोक्यातून निघालेला हा फंडा आहे. तर अभियंत्यांना ‘पळता भूई थोडी’ वीज कंपनीच्या या खुलेआम सुरू असलेल्या लुटीमुळे सामान्य ग्राहक संतापला आहे. वितरण कार्यालयात वीज देयकांच्या दुरुस्तीसाठी व जाब विचारण्यासाठी नागरिक धडक देत आहेत. यातूनच एखाद वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची आणि वीज अभियंत्यांना ‘पळता भूई थोडी’ होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. (जिल्हा प्रतिनिधी) महसूल वाढीसाठी युनिटची शंभरी पार करण्यावर भर ० ते १०० युनिटपर्यंत घरगुती ग्राहकाला ३ रूपये ७६ पैसे प्रति युनिट वीज दर आकारला जातो. १०० ते ३०० युनिटसाठी हा दर दुप्पट अर्थात ७ रुपये २१ पैसे, ३०० ते ५०० युनिट साठी ९ रुपये ९५ पैसे, ५०० ते १००० युनिटसाठी ११ रुपये ३१ पैसे आणि १००० पेक्षा अधिक युनिट वीज वापरावर १२ रुपये ०५ पैसे दर आकारला जातो. सामान्य ग्राहकाचे एका महिन्याचा वीज वापर जास्तीत जास्त १०० युनिट असतो. अर्थात त्याला ३ रुपये ७६ पैसे दराने देयक मिळते. परंतु हेच युनिट १०० पेक्षा अधिक गेल्यास थेट दुप्पट दर लावण्याचा वीज कंपनीचा मार्ग मोकळा होतो. म्हणूनच ग्राहकाचे बिल १०० युनिट पेक्षा अधिक कसे होईल, याकडे वितरण कंपनीचा कल असतो. शंभरपेक्षा अधिक युनीट व्हावे म्हणून २० दिवसात फोटो रिडिंग न घेणे, जाणीवपूर्वक विलंबाने रिडींग घेणे, उन्हाळ्यातील सर्वाधिक वीज वापराच्या एखाद्या महिन्यात फोटो रिडींग न घेता अॅव्हरेज बिल देणे, पुढील महिन्यात दोनही महिन्याचे एकत्र बिल देणे, त्यावर दुप्पट व शक्य असेल तेथे तिप्पट अर्थात ९ रुपये ९५ दराने वीज आकार लावणे असे प्रकार वीज कंपनीत सर्रास सुरू आहे. वीज कंपनीच्या अभियंते व यंत्रणेला विशिष्ट भागातील वीज चोरी-गळती रोखणे आवाक्याबाहेरचे आहे. तेथे वसुलीसाठी जाण्याची आणि वीज पुरवठा तोडण्याची हिंमत अभियंत्यांमध्ये नाही. कारण तेथे हल्ला होण्याची भीती असते. अशा भागातील वीज बिल वसुली होत नसल्याने आणि महसूल घटल्यास मुंबईतून जाब विचारला जात असल्याने या अभियंत्यांनी अन्य सामान्य ग्राहकांना १०० युनिट पेक्षा अधिक वीज वापराचे व त्यावर दुप्पट दर लावून आपल्या मासिक महसुलाची ‘लेव्हल’ मिळविण्याचा सपाटा लावला आहे.
महावितरणकडून वीज ग्राहकांची खुलेआम लूट
By admin | Updated: June 10, 2016 02:26 IST