अशोक पिंपरे - राळेगावग्रामीण जनतेला बचतीची सवय लागावी, बँकेचे व्यवहार कळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ई-बँकिंग ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. या बँकेचा राज्यस्तरीय शुभारंभ राळेगाव तालुक्यातील परसोडीतून झाला. आता या गावातील बहुतांश नागरिकांचे व्यवहार ई-बँकिंगच्या माध्यमातून होत असून याच गावची पहिली खातेदार सुवर्णा निवल या योजनेची ब्रॅड अॅम्बेसिडर झाली आहे. महाराष्ट्र शासनाने ग्रामीण जनतेसाठी ई-बँकिंग ही योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यास सुरुवात केली. ग्राहकांचे शून्य बॅलन्सवर खाते उघडण्यात आले. त्यानंतर अनेक ग्राहकांनी आॅनलाईन पद्धतीने व्यवहार केले. ग्रामीण जनता बँकेच्या व्यवहाराशी फॅमिलेअर झाली. काही लोक या व्यवहाराबाबत उदासीन असले तरी बहुतांश नागरिकांना मात्र ही योजना प्रेरणादायी आहे. ई-बँकिंगची राज्यातील पहिली खातेदार ठरलेली सुवर्णा अरुण निवल हिला राज्य शासनाने या योजनेची ब्रॅड अॅम्बेसिडर केले आहे. परसोडी येथील ग्रामपंचायत कर्मचारी योगेश जगताप आणि सुवर्णा निवल परिसरातील उमरी, टालेगाव, परसोडी, माटेगाव आदी गावात जावून नागरिकांना ई-बँकिंगबद्दल माहिती देत आहे. आतापर्यंत परसोडी परिसरातील ५२६ नागरिकांनी खाते काढले आहे. हे सर्व राष्ट्रीयकृत बँक आॅफ बडोदाशी जुळलेले आहे. गावातील व्यवहार गावातच चालविले जात असून महिलाही बँकेचे व्यवहार करीत आहेत. आता गावातील नागरिकांना बँक व्यवहाराची सवय लागली आहे. जनतेने ई-बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करावे, असे आवाहन सुवर्णा निवल यांनी लोकमतशी बोलताना केले.
ई-बँकिंगने लावली बचतीची सवय
By admin | Updated: September 14, 2014 00:16 IST