प्रकाश सातघरे - दिग्रस शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी २४ तास दक्ष राहणाऱ्या पोलिसांच्या निवासस्थानांची मात्र वाताहात झाली आहे. दिग्रस येथील ब्रिटिशकालिन पोलीस वसाहतीची प्रचंड दुरवस्था झाली असून अनेक निवासस्थानांची पडझड होत आहे. पावसाळ्यात तर अनंत समस्यांचा सामना करत पोलीस कुटुंबीयांना जीव मुठीत घेऊन राहावे लागते.दिग्रस येथे ब्रिटिशांच्या काळात पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. पोलीस ठाण्यासोबतच कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली. टुमदार असलेली ही वसाहत आता बकाल झाली आहे. स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही या वसाहतीची अवस्था कायम आहे. कार्यालयीन इमारत सोडून वसाहत बांधण्यात आली. सध्या या वसाहतीत ३१ निवासस्थाने आहेत. ठाणेदारासाठी स्वतंत्र निवासस्थान आहे. १५ कुटुंबीय येथे वास्तव्यास आहे. परंतु वसाहतीच्या निर्मितीनंतर देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाने कधी लक्षच दिले नाही. त्यामुळे वसाहतीची दुरावस्था झाली आहे. छतावरील कवेलू फुटले असून लाकूडफाटाही जीर्ण झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात घरामध्ये अक्षरश: धारा लागतात. अनेक कुटुंबांनी तर कवेलूवर प्लास्टिकचे आच्छादन टाकून गळणाऱ्या पाण्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. दारे, खिडक्याही खिळखिळी झाली असून साधा धक्का मारला तरी दार तुटू शकते, अशी अवस्था आहे. लाकडी दाराच्या पाट्या खालच्या बाजूला सडल्या आहे. त्यामुळे सरपटणारे प्राणी घरात येण्याची भीती असते. घरांच्या भिंतींनाही मोठाले तडे गेले आहे. त्यामुळे घर केव्हा कोसळेल याचा नेम नाही. शौचालयाची तर भीषण अवस्था आहे. शौचालयात जाणे तर दूरच जवळून जातानाही नाकावर रूमाल ठेवावा लागतो. त्यामुळे अनेक कर्मचारी उघड्यावर शौचास जाणे पसंत करतात. वसाहतीला सुरक्षा भिंत नाही, सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे वसाहतीत चिखलाचे साम्राज्य असते. दिवसभर शांतता व सुव्यवस्थेसाठी राबायचे आणि घरी आरामासाठी यावे तर घरातील मंडळी घराच्या अवस्थेचे गाऱ्हाणे मांडतात. असा दुहेरी ताण दिग्रस वसाहतीत राहणाऱ्या पोलिसांना सोसावा लागत आहे.
दिग्रसच्या पोलीस वसाहतीची वाताहत
By admin | Updated: September 10, 2014 00:00 IST