पुनर्वसनाकडे दुर्लक्ष : वर्धा नदीचा वेढा गावाला पडण्याचा धोका कायम वणी : पावसाळा सुरू होताच तालुक्यातील मुंगोलीवासीयांची धाकधूक सुरू झाली आहे. यावर्षी पावसाळा जोरात पडण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने मुंगोलीवासीय अधिकच धास्तावले आहे. पाऊस जोरात पडल्यास वर्धा नदीला आलेल्या पुरात आपले गाव डुबणार तर नाही ना, ही भिती त्यांना सतावत आहे. गावकऱ्यांनी कित्येक वर्षांपासून शासनाकडे पुनर्वसनाचा तगादा लावला. मात्र निगरगट्ट वेकोलि प्रशासन त्यांच्या हाकेला साद देण्याच्या मनस्थितीत नाही.तालुक्याच्या अंतिम टोकावर वसलेले मुंगोली गाव चोहोबाजूंनी वेकोलिचे ढिगारे व वर्धा नदीच्या विळख्यात सापडले आहे. गेल्या २० वर्षांपासून गावकरी भयभीत अवस्थेत गावात वास्तव्य करीत आहे. गावाचे पुनर्वसन करणे अत्यंत आवश्यक असतानाही वेकोलिकडून पुनर्वसनासाठी चालढकल केली जात आहे. यासाठी गावकऱ्यांनी आत्तापर्यंत प्रशासनाला व वेकोलिला अनेकदा निवेदने दिली. कित्येक आंदोलने केली. वेकोलिचे काम बंद पाडण्याचे आंदोलनसुद्धा केले. गेल्यावर्षी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मध्यस्थी करून वेकोलिला पुनर्वसन करण्यास बाध्य करण्यासाठी कसून प्रयत्न केले. त्यावेळी वेकोलिने डिसेंबर २०१५ पर्यंत मुंगोलीचे पुनर्वसन करण्याचे लेखी आश्वासनही दिले. मात्र हे आश्वासन अजूनही पाळल्या गेले नाही. वर्धा नदीच्या खोऱ्यात व वणी-कोरपना तालुक्याच्या सीमा रेषेवर असलेल्या मुंगोली गावाजवळ २० वर्षांपूर्वी सन १९९४ मध्ये खान सुरू केली. त्यासाठी तेथील ७० टक्के शेतकऱ्यांची शेती वेकोलिने विकत घेतली. मात्र उर्वरित ३० टक्के शेतकऱ्यांच्या शेती न घेतल्याने त्या शेतकऱ्यांना अद्यापही गाव सोडता आला नाही. गावापासून हाकेच्या अंतरावर कोळसा खाण असल्याने खाणीत होणाऱ्या स्फोटाचे धक्के गावाला बसतात. त्यामुळे अनेकांच्या घरांना तडे गेले. काही घरे कोसळूनही पडली. गावाच्या उत्तरेस वेकोलिची कैलासनगर वसाहत आहे. या वसाहतीच्या शौचालयाचे घाण पाणी गावाजवळ साचते. दक्षिणेस काहीच अंतरावर वेकोलिने टाकलेले मातीचे ढिगारे व दोन बाजूंनी वर्धा नदी, असे चारही बाजूंनी गाव कचाट्यात सापडले आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने वेकोलिच्या ढिगाऱ्यावरूनच मार्गक्रमण करावे लागते. स्फोटाच्या धुळीमुळे व उष्णतेमुळे शेतातील पिकांची वाढ खुंटते. त्यामुळे गेल्यावर्षी संपूर्ण जिल्ह्यात या परिसरातील पैसेवारी ५० टक्केच्या आत आली होती. ग्रामपंचायतीनेही ठराव करून गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी केली होती. नुकतेच यावर्षी पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंग यांनी या गावाला भेट देऊन पाहणी केली व वास्तव जाणून घेतले. तरी अजूनही गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळतच आहे. येथील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनीही या गावाचे पुनर्वसन करणे आवश्यक असल्याचा अहवाल प्रशासनाकडे दिला आहे. तरीही वेकोलि मात्र अधिकाऱ्यांचे आदेशही मानायला तयार नाही. (स्थानिक प्रतिनिधी)
मुंगोलीवासीयांना पुराची धास्ती
By admin | Updated: June 20, 2016 02:13 IST