यवतमाळ : शासनाने काही दिवसांपूर्वीच राज्यातील दुष्काळ परिस्थिती तालुक्यातील यादी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. या तालुक्यांमध्ये शासनाच्या निकषाप्रमाणे काही सुविधा पुरविल्या जातील. परंतु दुष्काळी तालुक्यात मदत मिळून देण्याच्या नावाखाली काही लोकांकडून आर्थिक मदतीची मागणी किंवा फसवणूक होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सतर्क राहून अशा लोकांच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे नोंदवाव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी केले आहे. जिल्ह्यात अनियमित पावसामुळे काही तालुक्यांमध्ये यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने सदर तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. या तालुक्यांमध्ये शासनाच्या निकषाप्रमाणे सोयीसुविधा पुरविल्या जाणार असून, काही बाबींना मुदतवाढ देण्यासारख्या उपाययोजना शासन करीत आहे. शासनाच्या या सुविधा मिळवून देतो किंवा मदत मिळवून देतो असे सांगून काही व्यक्ती किंवा वित्तीय संस्था शेतकऱ्यांची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अनधिकृत व्यक्ती आढळून आल्यास किंवा कुणी फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित शेतकऱ्यांनी जवळच्या तहसीलदार किंवा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात त्या व्यक्ती विरूद्ध तक्रार नोंदवावी. कुणीही पैशाची मागणी केल्यास पैशाचे व्यवहार करू नये. अशा बाबतींमध्ये शेतकऱ्यांनी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
दुष्काळ मदतीआड शेतकऱ्यांच्या फसवणुकीची प्रशासनाला भीती
By admin | Updated: August 30, 2014 02:11 IST