अब्दुल मतीन पारवायेथे निर्माण झालेल्या पाणी प्रश्नापुढे छोटे व्यावसायिक हतबल झाले आहे. गेली आठ दिवसांपासून बंद पडलेल्या पाणीपुरवठ्यामुळे त्यांना विकतच्या पाण्यावर गरज भागवावी लागत आहे. ड्रमभर पाण्यासाठी त्यांना ६० रुपये खर्च करावे लागत आहे. आधीच दुष्काळामुळे व्यवसाय मंदावले असताना पाण्यापोटी अधिकचा खर्च त्यांना करावा लागत आहे. शिवाय नागरिकांनाही दिवसरात्र पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पारव्याला वाघाडी नदीवर असलेल्या विहिरीवरून पाणी घेत योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या नदीमध्ये पाणी असल्याने नागरिकांची पाण्याची गरज पूर्ण होवू शकते, मात्र मोटरपंपाचे स्टार्टर बिघडल्याने पाणीपुरवठा थांबला आहे. चार-पाच दिवसांआड योजनेचा पाणीपुरवठा होत होता. आता टाकीमध्ये पाणी भरले जात नसल्याने नागरिकांना विहिरी आणि हातपंपावर धाव घ्यावी लागत आहे. यावर उपाय म्हणून सुरू करण्यात आलेले केवळ एक टँकर नागरिकांची गरज भागवू शकत नाही. पारव्याला दरवर्षी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यावर्षी काही दिवस यातून सुटका झाली तरी आता मात्र तांत्रिक बिघाडामुळे इतर स्रोतांवर जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. गावात असलेल्या विहिरींनी तळ गाठला आहे. गुंडभर पाण्यासाठी तासंतास थांबावे लागते. शिवाय हातपंप कोरडे पडले आहे. गावशिवारात असलेल्या शेतामधील विहिरींवर गर्दी होत आहे. तरीही ग्रामपंचायतीकडून कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाही. येथे असलेल्या व्यावसायिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. एक ड्रम पाण्यासाठी ६० रुपये खर्च करावा लागत आहे. पाणी विकणाऱ्याचे १५ रुपये, टाकीच्या भाड्याचे २० रुपये आणि व्यवसायाच्या ठिकाणी पोहोचविण्याचे २५ रुपये असे एकूण जवळपास व्यावसायिकांना ६० रुपये खर्च करावा लागत आहे. काही ठिकाणी तर हा खर्च १०० रुपयांपर्यंत जावून पोहोचतो. ग्रामपंचायतीने स्टार्टर दुरुस्त करून पाणी समस्या दूर करावी, अशी मागणी आहे. पारवा येथील नागरिकांना दरवर्षीच पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागते. यानंतरही कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही.
ड्रमभर पाण्याचा खर्च " ६०
By admin | Updated: May 18, 2015 02:18 IST