यवतमाळ : जिल्हा नियोजन समितीच्या आठ सदस्य पदासाठी झालेल्या मतदानाचे निकाल बुधवारी जाहीर करण्यात आले. त्यात अपक्ष मिलिंद धुर्वेसह दोन उमेदवार पराभूत झाले. या निवडणुकीत चार ते पाच मते फुटली असून ती नेमकी कोणत्या पक्षाची यावर राजकीय खल सुरू झाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या आठ जागांसाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले. ग्रामीण निर्वाचन क्षेत्र-सर्वसाधारण प्रवर्गात ६२ पैकी ६१ मतदारांनी मतदान केले होते. त्याची मतमोजणी बुधवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्याचे निकाल जाहीर करण्यात आले. विजयी उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल शंकरराव राठोड (दहा मते), प्रवीण विनायकराव देशमुख (८ मते) व राकेश राघोलू नेमनवार (५ मते) हे विजयी झाले. शिवसेनेचे दिवाकर धनू राठोड (७ मते) व आशिष आनंदराव कुळसंगे (१७ मते) हे दोघे तर प्रकाश देवराव कासावार (१२ मते), सोनबा भीमराव मंगाम (१५ मते) व सीमा मुकेश देशभ्रतार (११ मते) हे विजयी झाले. अपक्ष उमेदवार मिलिंद प्रभाकरराव धुर्वे (५ मते) व राष्ट्रवादी काँग्रेसचे राकेश राघोलू नेमनवार (५ मते) या दोघांनाही सारखेच मते पडल्याने या ठिकाणी इश्वरचिठ्ठीचा उपयोग करण्यात आला. यामध्ये राकेश नेमनवार विजयी झाले तर मिलिंद धुर्वे यांचा पराभव झाला. भाजपाच्या उषा रामसिंग राठोड (४ मते) यादेखील पराभूत झाल्या. वैध मतांची संख्या ही ६१ होती. काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य योगेश पारवेकर हे मतदानाच्या अंतिम वेळेपर्यंत पोहचू न शकल्याने त्यांचे मतदान झाले नाही. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी काम पाहले. मतमोजणी पर्यवेक्षक म्हणून उपजिल्हाधिकारी संतोष पाटील व सहाय्यक म्हणून तहसीलदार अनुप खांडे, प्रमोद बाकडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
जिल्हा नियोजन समिती निवडणुकीत मते फुटली
By admin | Updated: August 13, 2015 03:06 IST