यवतमाळ : गोवंश हत्याबंदी कायदा आणि प्रस्तावित भूमिअधिग्रहण कायद्याच्या विरोधात यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बैल मोर्चा काढण्यात आला होता. भारिप बहुजन महासंघ, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.यवतमाळ शहरातील कळंब चौकातून या मोर्चाला प्रारंभ झाला. बैलगाड्यासह निघालेल्या या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरकारने नव्याने लागू केलेला गोवंश हत्याबंदी कायदा शेतकऱ्यांवर अन्याय कारणारा आहे. यामुळे भाकड जनावरे खरेदी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे. त्यामुळे भाकड जनावरे विकायची कशी असा प्रश्न निर्माण होईल. सरकारने हा कायदा लागू करतानाच भाकड जनावरांची खरेदी करण्याची जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच प्रस्तावित भूमिअधिग्रहण कायद्यामुळे शेतकऱ्यांची शेतीवरील मालकी संपेल आणि उद्योजकांचे घर भरले जाईल. हा प्रकार शेतकऱ्यांना संपविण्याचा घाट असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जिल्हा कचेरीवर पोहोचलेल्या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले. सरकारच्या निर्णयाचा निषेध करीत गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करावा, अशी मागणी लावून धरली. मोर्चात भाकपचे राज्य सचिव तुकाराम भस्मे, माकपचे जिल्हा सचिव शंकर दानव, मोर्चाचे समन्वयक संजय बोरकर, डी.बी. नाईक, अनिल घाटे, दिवाकर नागपूर यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. कळंब चौकातून मोर्चा निघाला तेव्हा जनावरांचा कळप मोर्चाच्या अग्रभागी होता. त्या पाठोपाठ बैलगाड्या होत्या. विविध घोषणांचे फलक लावलेल्या बैलगाड्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. मोर्चेकऱ्यांनी दिलेल्या घोषणांनी शहर दणाणले होते. (शहर वार्ताहर)
जिल्हा कचेरीवर धडकला बैल मोर्चा
By admin | Updated: May 14, 2015 02:12 IST