यवतमाळ : मनोबल खचलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी प्रशासनाने कलात्मक मार्ग अवलंबला. जिल्हाधिकारी कार्यालयात आपली व्यथा घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना नवी प्रेरणा मिळावी म्हणून कार्यालयाच्या भिंती ‘बोलक्या’ करण्यात आल्या. त्यासाठी सोमवारी अनोखी चित्रकला स्पर्धा पार पडली. यात शेकडो कलावंतांनी सहभागी होत जिल्हा कचेरीच्या भिंतींवर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी चित्रे काढली.महाराष्ट्र कलाध्यापक संघ महामंडळ जिल्हा संघटना आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने ही संकल्पना पुढे आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात येणारा प्रत्येक शेतकरी नवीन विचार घेऊन आपल्या गावी परत जावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंंतींना ‘प्रेरक’ बनविण्यात आले आहे. शेती आणि शेतीशी पूरक व्यवसायावर भर देणारी विविध चित्रे यावेळी रेखाटण्यात आली आहेत. शहरातील २१ शाळांच्या ३०० विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला. यासोबतच २५ हौशी कलावंतही सहभागी झाले होते.विशेष उत्कृष्ट चित्र रेखाटणाऱ्या विद्यार्थ्यांना बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या योगदानाला कौतुकाची थाप देण्यासाठी प्रयास ग्रूप, अमोल इंडस्ट्रीज, एसबीआय बँक, संताजी महिला मंडळ, बळीराजा चेतना अभियानाच्यावतीने खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, महाराष्ट्र कलाध्यापक संघ मंडळाचे जिल्हाध्यक्ष नीलेश तायडे, सचिव सुधीर कानतोडे, प्रवीण जिरापुरे, महेश ठाकरे, सुधीर सोनवने, बबलू राठोड, नरेंद्र गौरकार, राजू वनकर, सिद्धार्थ भगत, राजू गोटे आदी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)
जिल्हा कचेरीच्या भिंती बनल्या शेतकऱ्यांचे ‘प्रेरणाचित्र’
By admin | Updated: February 23, 2016 03:01 IST