झरी : गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यातील खातेरा येथील शेतकरी विजेच्या समस्येमुळे त्रस्त झाले. त्यांनी थेट शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या कथन केली.कधी भारनियमन, तर कर कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने शेतकरी व ग्राहक कमालिचे वैतागले आहेत. कमी होल्टेजमुळे मोटारपंप सुरू होत नाही. अनेक ट्रान्सफार्मरवर अधिक जोडण्या करण्यात आल्याने मोटारपंपला पुरेसे व्होल्टेज मिळत नाही. दिवसभर भारनियमन असते. त्यामुळे ओलित करता येत नाही. रात्री होल्टेज वाढते म्हणून शेतकरी रात्र जागून काढत ओलित करतात. मात्र रात्रीही अनेकदा होल्टेज वाढतच नाही.शेतकऱ्यांना सोयाबीनने दगा दिल्यानंतर आता परिसरातील मिरची पिकावरही रोग येत आहे. परिणामी काहींनी मिरची उपटून हरभराची पेरणी केली. मात्र वीज समस्येमुळे पीक कसे वाचवावे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला. बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहे. त्यांनी पैसे जमा करून सिंचनाची व्यवस्था केली. मात्र विजेची समस्या असल्याने त्यांना ओलित करणेही आता कठीण झाले आहे. येथील महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी फोनवर संपर्क केल्यास वरूनच वीज पुरवठा बंद असल्याचे सांगण्यात येते. मात्र या परिसरातील चुना भट्ट्यांना वीज पुरवठा व्यवस्थित मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय गुन्हा केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या हिवाळी परीक्षा सुुरू आहे. त्यांना कमी होल्टेजमुळे अभ्यास करता येत नाही. शेतकऱ्यांनी आखलेली स्वप्नेही विजेअभावी धुळीस मिळत आहे. ही विजेची समस्या कायमची सोडवावी, हअशी मागणी खातेरावासीयांनी केली. तेथील प्रा.देविदास गायकवाड यांच्या नेतृत्वातील शेतकरी मंडळाने या समस्येबाबत थेट जिल्हाधिकारी व महावितरणचे अधीक्षक अभियंता यांची यवतमाळ येथे भेट घेतली. त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मनोहर ताजने, कवडू बुट्टे, शंकर भोयर, रंजीत गोडे, जगन उरकुडे, गंगाधर बांधे, पांडुरंग कोडापे, नितीन भोयर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
खातेरावासीय भेटले जिल्हाधिकाऱ्यांना
By admin | Updated: November 10, 2015 03:10 IST