‘मेडिकल’मधील प्रकार : बालक गंभीर, दोषींवर कारवाईची मागणी
यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूती वॉर्ड हा येथील कर्मचार्यांच्या वर्तणुकीमुळे नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. रात्री ११.३० वाजता प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला चक्क एक तास तडफडत ठेवून नंतर उपचारासाठी दाखल करून घेतले. दोन दिवस उपचार केल्यानंतर त्या महिलेला अक्षरश: हाकलून देण्यात आले. या प्रकरणी नातेवाईकांनी अधीष्ठात्यांकडे तक्रार केली आहे. नेर तालुक्यातील सिंदखेड येथील पपिता जगदीश राठोड या महिलेला प्रसवकळा सुरू असताना २१ मे रोजी रात्री ११.३० वाजता शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी कर्तव्यावर असलेल्या प्रसूती विभागातील कर्मचार्यांनी या महिलेला वॉर्डात दाखल करून घेतले नाही. तिच्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. त्यानंतर रात्री १२ वाजता दाखल करून घेतले. एवढ्या रात्री उपचारासाठी औषधी लागत असल्याने नातेवाईकांना वारंवार एका खासगी रुग्णालयात पाठविले. प्रसूतीदरम्यान हयगय केल्याने बाळाची प्रकृती गंभीर झाली. अशा स्थितीत २३ मे रोजी बाळ व बाळंतीणीला रजा न देता गंभीर अवस्थेत रुग्णालयातून हाकलून दिले. याबाबत दाद मागितली असता सर्वच कर्मचार्यांनी उद्धटपणाची वागणूक देत कुठेही जा, अशा शब्दात दरडावून हाकलून दिले, अशी तक्रार वसंत सवाई राठोड यांनी अधीष्ठाता डॉ.आनंद डोंगरे यांच्याकडे केली आहे. आर्थिक परिस्थिती नसतानाही बाळाची प्रकृती गंभीर असल्याने शेवटी त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रसूती विभागात रुग्णांना योग्य उपचार व वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारी होत आहे. प्रसूतीदरम्यान माता मृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. या संदर्भात राज्य मानवी हक्क आयोगाकडे प्रकरण दाखल असतानाही वागणुकीत कोणताच बदल झालेला दिसत नाही. रुग्णालय प्रशासनाकडून केवळ थातूरमातूर चौकशी करून प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न केला जातो. येथील प्रसूती विभाग आणि बालरोग विभागाचा कारभार महिला व बालकांच्या जीवावर उठल्याचे दिसून येते. या बाबत वरिष्ठांसह तेथील कार्यरत अधिकारी, डॉक्टर व कर्मचारी दोषी आहे. त्यानंतरही परिस्थिती सुधारण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच रुग्णांसोबत चुकीचा व्यवहार करण्याचे प्रकार वारंवार घडत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)